रत्नागिरी पंचायत समितीच्या सुमारे ९ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या नवीन प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन समारंभ मंत्री सामंत यांच्या हस्ते मंगळवारी पार पडला. परंतु, निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव न छापल्याने, जि.प.चा एकही अधिकारी या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाप्रसंगी उपस्थित राहिला नाही. शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत चांगलेच तापले आहेत.
अनेकदा राजशिष्टाचार बाजूला ठेवून मी मंत्री असून जनहिताच्या सर्व कार्यक्रमाना उपस्थित राहतो. पण अधिकारी हे जनतेचे सेवक असून त्यांनी जनतेला असे वेठीस धरणे योग्य नाही. तुम्हाला अधिकार असतील, तर मंत्री म्हणून आम्हांलाही अधिकार आहेत याचे भान असावे. अशा शब्दात जि.प. मधील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अशा अधिकाऱ्यांना वेळीच आवर घालण्याची गरज असून ती वेळ आल्याचे सामंत यांनी ठणकावले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहा समोरच्या जागेमध्ये ही इमारत उभारत आहे. मंत्री सामंत यांनी ठेकेदाराला वर्षभरात या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याची सूचना केली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने, नगराध्यक्ष प्रदीप उर्प बंड्या साळवी, न.प. गटनेते राजन शेट्ये, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, तहसीलदार शशिकांत जाधव, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, महिला व बालकल्याण समिती सभापती भारती सरवणकर, सदस्य महेश उर्फ बाबू म्हाप, पंचायत समिती सभापती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत, शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.
नाम. सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन कोनशिलेचे अनावरण झाल्यानंतर अल्पबचत सभागृहात हा कार्यकम पार पडला. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याची उपस्थिती नव्हती. उपसभापती उत्तम सावंत यांनी तयार केलेल्या निमंत्रण पत्रिकेत अधिकाऱ्यांची नावे छापायची राहिली असतील, परंतु जनतेचा कार्यक्रम म्हणून मंत्री उपस्थित असताना अधिकाऱ्यांनी उपस्थित न राहणे किती योग्य आहे ! हा कोणताही पक्षीय कार्यक्रम नव्हे तर शासकीय कार्यक्रम आहे, याची गांभिर्याने दखल आपण घेतल्याचे सांगितले.
चांगल्या कामातही राजशिष्टाचार आडवा येत असेल तर अधिकाऱ्यांनी जनतेचे सेवक आहोत याचे भान ठेवले पाहिजे. राजकारणी राजकारण करण्याचे त्यांचे काम करतात, ते सत्ताधारी असो किंवा विरोधक परंतु अधिकाऱ्यांनी राजकारण करण्याचे कारण काय, असा खरमरीत सवाल सामंत यांनी केला. जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमाला अनेकवेळा मला निमंत्रण नसते. काहीवेळा कार्यक्रमापूर्वी सांगितले जाते. परंतु राजशिष्टाचार बाजूला ठेवून मी कार्यक्रमाला उपस्थित राहतो. जनतेसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे, हे मी माझे कर्तव्य समजतो. येथे मी राजशिष्टाचार बघत बसत नसल्याचे सामंत यांनी सांगितले.