नवरात्रीमध्ये अनेक जण ९ दिवस उपवास करतात. काही जण त्या नऊ दिवसांमध्ये अनवाणी चालतात. जमिनीवर अनवाणी चालण्याचे अनेक फायदे आहेत. हल्ली घरामध्ये सुद्धा चप्पल घालून वावरत असतात. पण अनवाणी पायाने मोकळ्या हवेत चालण्याचे खूपच चांगले फायदे आज आपण पाहणार आहोत.
पूर्वीची माणस बिना चपलाचे अख्ख गाव हिंडून येत असत. आपले आजी आजोबा नेहमी सांगत असतात कि, गवतावरून अनवाणी चालण्याने शरीरामध्ये खूप सकारात्मक बदल घडून येतात. नजर चांगली राहते, हात पायांच्या नसा मोकळ्या होतात. कितीही चालले तरी दमायला होत नाही. या नैसर्गिक रित्या केल्या जाणाऱ्या उपायांना शास्त्रीय भाषेत नॅचरोपॅथी म्हणतात. पूर्वीची माणस म्हणजेच जून खोडं यांना कधी गंभीर आजाराचा सामनाच करावा लागला नाही. कारण, एकतर स्वच्छ वातावरण आणि शारीरिक कामे भरपूर त्यामुळे आजार त्यांच्या जवळपास सुद्धा भटकत नसे.
पंचमहाभूतांपैकी पृथ्वी,जल, अग्नी, वायू, आकाश या सर्व महाशक्ती आहेत. मानवी शरीराची रचना हि या प्रमुख पंचतत्त्वांनी बनलेली आहे. पण जर या पंचतत्वाचे समीकरण बिघडले तर मात्र लहान मोठे आजार शरीरामध्ये घर करू लागतात. या महाशक्तींचा आपल्या आयुष्यात निरोगी आरोग्यासाठी कसा उपयोग करुन घेता येईल? हे पाहूया थोडक्यात. नवरात्रीच्या निमित्ताने अनवाणी चालण्याचे फायदे जाणून घेऊया.
अनेकांना कमी वयातच अनेक अवयवांची दुखणी जसे, गुडघेदुखी, कंबरदुखी जडते. परंतु, अनवाणी चालल्याने अशी दुखणी कमी होण्यास मदत होते. डोळ्यांचे विकार कमी होऊन नजर चांगली होते. स्नायूंच्या मासपेशींची ताकद वाढून शरीर लवचिक बनून क्रियाशील व्हायला मदत होते.
चालण्याचे फायदे भरपूर आहेतच पण अनवाणी चालल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत कार्यरत होते व स्नायुतील प्रत्येक अणुरेणूंपर्यंत प्राणवायू पोहोचवला जातो. त्याचप्रमाणे हृदयाचे आरोग्यमान सुधारते. रक्तपुरवठा सुरळीत होतो, त्यामुळे त्यासंदर्भातील आजार दूर होऊन, आयुर्मान वाढते.
जसे कोणत्याही विद्युत उपकरणाला शॉक बसू नये म्हणून त्याचे अर्थिंग केले जाते तसेच अनवाणी चालण्याने सुद्धा अविश्वसनीय फायदे शरीराला होतात. शरीरातील विद्युत घटक जमिनीकडे ओढले जाऊन ते बाहेर पडतात. जमिनीवरील खड्डे, गोटे, वाळू घर्षणामुळे नैसर्गिक एक्युप्रेशर होते व संपूर्ण नसा मोकळ्या होतात. मानसिक आरोग्याप्रमाणे, मधुमेह, हृदयरोग, त्वचारोग यासाठी देखील अनवाणी चालणे उत्तम ठरते व मेंदू पर्यंत सुरळीत रक्त पुरवठा होतो.