कोकणवासियांच्या लाडक्या गणपती उत्सवाला अवघे ५ दिवस शिल्लक राहिले असताना एस.टी. बँक उघडण्याचे नाव घेत नसल्याने हजारो कर्मचारी चिंतेत असून हक्काचे पैसे काढता येत नसल्याने अक्षरशः रडकुंडीस आले आहेत. सण उचल मिळेल ती सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याना. पण हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांनी प्रेमापोटी ठेवलेली आपली कष्टाची कमाई अडचणीत सापडली आहे त्याचे काय.. असा संतप्त सवालही विचारण्यात येत आहे.
महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेने आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण सुरु केले होते. महागाई भत्त्यावरुन वाद सुरु आहे. उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये यशस्वी तोडगा काढण्यात आल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. सण उचल १२ हजार ५०० रुपये मुळ वेतनाची अट न घालता दिली जाईल ही तसेच इतरही मागण्या म्हणे मंजुर झाल्या आहेत. हे सर्व ठीक आहे. पण आमची हक्काची बैंक का बंद करुन ठेवली आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांनी करायचे काय? – ऐन सणासुदाला आम्ही कोणाकडे हात पसरायचे..? सावकारांकडून कर्ज घ्यायचे का..? हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांची तर बिकट अवस्था झाली आहे. आमचेच पैसे आम्हाला काढता येत नाहीत हे आमचे दुदैव आहे. बँकेच्या व्यवहारांची चौकशी यथावकाश करा. ठेवी वाढल्या की घटल्या याचा हिशोब नंतर करा, पण २ दिवसात बँकेचे कुलूप उघडून आमच्यावर आलेले संकट दूर करावे, पालकमंत्र्यानी यात गांर्भीयाने लक्ष घालावे, असे साकडे एस. टी. कर्मचाऱ्यांनी घातले आहे.