HomeChiplun२ तरूणांचा वाशिष्ठी नदीच्या डोहात बुडून मृत्यू

२ तरूणांचा वाशिष्ठी नदीच्या डोहात बुडून मृत्यू

ओमळी गोंधळेवाडी येथील दोघा युवकांचा खांदाट- पाली येथे वाशिष्ठी नदीच्या मारुती मंदिर जवळ असलेल्या डोहात बुडून निधन झाले. ही घटना सोमवारी दुपारी घडली. मंगळवारी दोघांचेही मृतदेह पाली डोहात आढळले. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या अधिक माहितीनुसार, ओमळी गोंधळेवाडी येथील विक्रम रविंद्र देवांग (२३) व हर्षल अनिल यादव (११) हे दोघे सोमवारी सकाळी मासेमारी करण्यासाठी पाली मारुती मंदिरजवळच्या वाशिष्ठी नदीच्या डोहात उतरले होते. त्यांची दुचाकी, मोबाईल व अन्य वस्तू पाली पुलावर होत्या. सकाळी घराबाहेर पडलेले दोघेही रात्रीपर्यंत घरी न आल्याने रात्री उशीरा चिपळूण पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची फिर्याद देण्यात आली होती.

त्यानुसार पोलीस त्यांचा शोध घेत असताना मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्याने हर्षलचा मृतदेह आढळला. पाली ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी विक्रम देवांग हा पळून गेला असावा असे काहींना वाटले परंतु काही वेळाने त्याच डोहात विक्रमचा मृतदेह आढळला. दोघांच्याही पोटाजवळ मुळे बांधलेले आढळले. पाचवीत शिकणाऱ्या हर्षलला पोहता येत नव्हते. कदाचित तो बुडताना त्याला वाचविताना विक्रमही बुडाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. दोघांचेही मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी कामथे उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. या प्रकरणी शंकर यादव व लक्ष्मण रसाळ पोलिसात फिर्याद दिली आहे. सायंकाळी शवविच्छेदन करुन ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी त्यांच्यावर ओमळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular