पुरवठा विभागा व रेशन दुकानदारांसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या जुन्या टु-जी कनेक्टिव्हिटी असलेल्या ई पॉस मशिन अखेर बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी रेशन दुकानदारांना नव्या फोर-जी कनेक्टिव्हिटी असलेल्या मशिन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रेशन दुकानदारांची डोकेदुखी बंद होणार आहे.
सरकारी रेशन दुकानातून धान्य वाटप करताना होत असलेला नियोजनबद्ध कार्यक्रमांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये टप्याटप्याने ई-पॉस मशिनद्वारे धान्य वाटपाची मोहीम राबवण्यात आली आहे. सुरवातीला रेशन दुकानदारांनी ऑनलाईन धान्य वाटपाला काही प्रमाणात विरोध केला, परंतू त्यानंतर मात्र रेशन दुकानदारांनी काळ्या बाजाराच्या आरोपातून मुक्त होण्यासाठी ई पास मशिन धान्य वाटपासाठी उत्साह दाखवला. त्यामुळे सन २०१६ पासून जिल्ह्यात ऑनलाईन अर्थात ई पास मशिनद्वारे धान्याचे वाटप करण्यात येत आहे. परंतू सदर मशिन कालबाह्य झाल्या असून त्यामध्ये वेळोवेळी तांत्रिक बिघाड निर्माण होत आहेत. या व्यतिरिक्त सदर मशिन या टू-जी कनेक्टिव्हिटीच्या असल्याने त्याद्वारे धान्य वाटप करण्यास अडचणी येत आहेत.
अनेक ठिकाणी नेटवर्क मिळत नसल्याने धान्य वाटप सुद्धा वेळेवर करण्यात येत नाही. कनेक्टिव्हिटीमुळे अनेकदा वाद झाल्याचे सुद्धा प्रकार घडले आहेत. यावर आळा बसावा यासाठी लवकरच कालबाह्य टू-जी कनेक्टिव्हिटीच्या मशीन बदलण्यात येणार असून त्याठिकाणी नव्या फोर जी कनेक्टिव्हिटीच्या मशिन लावण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरच रेशन दुकानदारांची डोकेदुखी कमी होईल व धान्य वाटपात आणखी सुसूत्रता आणि जिल्ह्यातील धान्य वितरणालाही गती मिळणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश पॉस मशिन कालबाह्य झाल्या आहेत. मशिन टू-जी कनेक्टिव्हिटीच्या असल्याने धान्य वाटपात तांत्रिक अडचणी येत आहेत. ही बाब आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.