भाजपतर्फे राज्यभर ३ एप्रिल पासून सहा दिवस ‘बूथ विजय अभियान’ राबवण्यात येत आहे, अशी माहिती भाजप प्रदेश प्रवक्ते व प्रदेश कार्यकारिणी सदस्य समीर गुरव यांनी भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या अभियानांतर्गत प्रत्येक बूथवर मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा ३७० मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. या द्वारे महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे मताधिक्य वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे गुरव यांनी सांगितले. बूथ विजय अभियानांतर्गत समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य असून प्रत्येक बूथवर या सहा दिवसांत विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.
घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे, प्रत्येक घर व वाहनावर स्टिकर्स लावणे, लाभार्थ्यांशी नियमित संपर्कात राहणे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपचा झेंडा लावणे आदी उपक्रम राबवले जातील. युवावर्ग, महिला असे समाजातील विविध घटकांसाठी ५ समूह बैठकाही घेण्यात येतील. बूथपासून दूर राहणाऱ्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे समीर गुरव यांनी सांगितले. बूथ समिती, प्रमुखांची नियुक्ती, १००हून अधिक जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनवण्यात येईल. प्रत्येक विधानसभा मतदार संघात बूथ कार्यकर्ते व पन्ना प्रमुखांचे संमेलन घेण्यात येणार आहे.
संमेलनाला उपस्थित प्रत्येक बूथ अध्यक्षाला त्या त्या बूथनुसार मतांमधील वाटा किती असायला हवा, मागच्या ३ निवडणुकांमधील मतदानाची आकडेवारी व आवश्यक माहिती देण्यात येणार आहे. संमेलनामध्ये बूथ समिती व पन्ना प्रमुखांकडून अपेक्षित कार्यावर व जबाबदारीबाबत विस्तृत चर्चाही होतील, असे गुरव यांनी सांगितले. या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, शहराध्यक्ष राजन फाळके, प्रसिद्धीप्रमुख उमेश कुळकर्णी, कोकण विभाग समन्वयक अभिजित पेडणेकर, सरचिटणीस मंदार खंडकर आदी उपस्थित होते.