राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे तीन दिवसाच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कोकणामध्ये पर्यटन व्यवसायासाठी मोठा वाव असून, विविध प्रकल्प तिथे साकारण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून स्थानिक नागरिकांना त्यातून रोजगार मिळून, उत्पन्नाचे साधन शोधण्यासाठी त्यांना आपला जिल्हा किंवा गाव सोडून बाहेर जावे लागणार नाही.
सिंधुदुर्ग दौर्यावरून रत्नागिरीच्या दिशेने येत असताना, यांच्या सुरक्षा ताफ्यात असलेल्या वाहनाला आज जोरदार अपघात झाला. कोणतेही मंत्री जिल्ह्यात येणार म्हटल्यावर, पोलीसांची मोठ्या प्रमाणात धावपळ असते. त्यांच्या स्वागतासह त्यांना निघताना जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत सोडून येण्यापर्यंत त्यांची ड्युटी असते. आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाच्या हलगर्जीपणामुळे मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट जवळ अपघात घडला. ताफ्यातील दोन-तीन वाहनांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे आपल्या नियोजीत दौऱ्यानुसार सिंधुदुर्ग येथून रत्नागिरीला निघाले असता, या वेळी खारेपाटण येथे सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात झाला. प्रोटोकॉलनुसार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्या एकापाठोपाठ एक निघाल्या होत्या. दरम्यान, ताफ्यातील एका वाहनाच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्याने, पाठीमधून येणाऱ्या दोन गाड्या एकमेकांवर वेगाने आदळल्या आणि हा अपघात घडला. मंत्र्यांच्या प्रोटोकॉलमध्ये वाहनांची गती एक सारखी असते त्यामुळे एका वाहन चालकाने अचानक लावलेल्या ब्रेकमुळे हा अपघात झाला. दरम्यान, या अपघातात कोणीही जखमी झाले नसून सर्वजण सुरक्षीत आणि स्थिर आहेत.