मागील आठवड्यापासून, राजकारणात होत असलेली उलथापालथ लक्षात घेता, आणि महा विकास आघाडीला करावा लागलेला पायउतार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला राजीनामा यामुळे अनेक खलबते एका रात्रीमध्ये घडली. अनेक शिवसैनिकांची यावर नाराजगी दिसून आली. आणि बंडखोरांनी केलेली गद्दारी अनेक जुन्या शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली. बंडखोरांच्या पक्षाच्या प्रती निष्ठा किती पातळीपर्यंत आहेत त्याबाबत शंका निर्माण झाली.
शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी या बंडखोरीबद्दल सडकून टीका केली आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राला मुख्यमंत्री पदावरून ज्यांनी पक्षाची बंडखोरी करून पायउतार व्हायला लावले ते कसले शिवसैनिक ? त्या बंडखोरांना मातीत गाडल्याशिवाय आता स्वस्थ बसायचे नाही. पुन्हा पक्षात त्या बंडखोरांना स्थान देऊ नका. शिवसेना शुन्यातून पुन्हा एकदा निर्माण करता येईल.
चिपळूण येथील लक्ष्मीबाई माटे सभागृहात आयोजित चिपळूण तालुका आणि गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यामध्ये ते बोलत होते. चिपळूण गुहागरमध्ये कसल्याही प्रकारच्या बंडाची झळ पोहोचलेली नसली, तरी सर्वांनी या अनुभवावरून सावध राहण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले. पुढे बोलताना अनंत गीते म्हणाले की, शिवसेनेला अशा प्रकारच्या संकटांची सवय आहे. यापूर्वीही छगन भुजबळ , नारायण राणे गेले, पण यावेळचे हे बंड वेगळे आहे. जे आधी गेले त्यांना अन्य पक्षांनी त्यांच्यात सामावून घेतले. पण आताचे हे बंड वेगळे असून त्यांनी वेगळा गट स्थापन केला आहे.
भाजपची जोरदार साथ आताच्या बंडाला आहे. पक्षातून बंडखोर गेले आणि संकट टळले असे नाही. बंडखोर पक्षप्रमुखांना सतत आव्हान देत आहेत त्यावरुन समजावे कि, हे संकट अद्याप टळलेले नाही, पुढे त्याची तीव्रता मोठी होणार असल्याची शक्यता आहे. जसे आपण सर्वांनी कोरोना होऊ नये म्हणून लस घेतली, त्याप्रमाणे बंडाची झळ सर्वसामान्य शिवसैनिकापर्यंत पोहोचू नये यासाठी आजचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे अनंत गीते यांनी सांगितले.