पावसाळा तोंडावर आलेला असताना मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला पुन्हा ब्रेक लागला आहे. मुरूगवाडा येथे जमिनीची नोंद नसल्याने तेथील काम थांबले आहे. बंधाऱ्याचे अंदाजपत्रक बनवणाऱ्या कंपनीने या बंधाऱ्याकरिता जमिन आवश्यक आहे याची खात्री न करता अंदाजपत्रक बनवल्याने ही अडचण उद्भवल्याची चर्चा सुरू असून काही ग्रामस्थांनी देखील त्याला दुजोरा दिला आहे. रत्नागिरी शहरालगतच्या मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामात सातत्याने अडथळे येत आहेत. सध्या सुरू असलेल्या कामांने काहीसा वेग पकडला असल्याचे दिसत असतानाच मुरूगवाडा येथे समस्या उभी राहिली आहे. १६० कोटी रूपये या बंधाऱ्यासाठी मंजूर झाले आहेत. साडेतीन कि.मी. लांबीच्या या बंधाऱ्याचे काम सुरू झाले. १३०० मीटर लांबीच्या बंधाऱ्याचे काम पूर्ण होतही आले आहे. मात्र मुरूगवाडा येथील पंधरामाड ते तावडे यांच्या घरापर्यंतची जागा ही वनविभागाची आहे. ५०० ते ६०० मीटर जागा नगर परिषदेची असून नगर परिषदेच्या या शहर विकास आराखड्यात हा रस्ता आहे. या रस्त्याचे काम रत्नागिरी न.प.कडून यापूर्वीच झाले आहे. धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे अंदाजपत्रक मोनार्ज कंपनीने केले होते.
जागा गृहित धरून हे अंदाजपत्रक तयार केले. परंतु मोठ्याप्रमाणावर धुप होऊन तात्पुरत्या स्वरूपात दगड टाकून धोका टाळण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. कंपनीने अंदाजपत्रक तयार करताना जागेबाबत चौकशी आणि कागदपत्रांची तपासणी करायला हवी होती. परंतु तसे झाले नाही. आता या परिस्थितीत हा बंधारा बांधायचा म्हटला तर रस्ता बंधान्याखाली जाणार आणि तेथील रहिवाशांना अडचण निर्माण होईल. म्हणून मरिनड्राईव्हच्या धर्तीवर जेव्हा सुशोभिकरण होईल तेव्हा तेथे जाण्यासाठी रस्ता नसेल. बंधाऱ्याचे काम करताना रस्ता हवा जेणेकरून सुशोभिकरणानंतर पर्यटकही येतील आणि त्यातून स्थानिकांना रोजगार मिळेल अशी संकल्पना आहे. जमिनीची हद्द निश्चित करून बंधारा बांधावा अशी मागणी तेथील माजी नगरसेवक बावा नागवेकर यांनी केली आहे. आता या नव्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पत्तन विभागाकडून जमि नीच्या मोजणीसाठी २५ लाख रूपये भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. जमिनीची निश्चिती झाल्यावर पुन्हा बंधाऱ्याच्या कामाला सुरूवात होईल. त्यामुळे पावसाळ्यानंतर हे काम सुरू होईल, असे बोलले जाते.