गेल्या अनेक महिन्यांपासून रेपो रेट न वाढता जशाच तसा होता. मात्र अचानक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेत बेंचमार्क पॉलिसी रेटमध्ये वाढ केल्याचे जाहीर केले. आरबीआयच्या पतधोरण समितीने रेपो रेटमध्ये ४० बेसिस पॉइंट म्हणजेच ०.४ टक्के वाढ केली आहे. कोरोनाच्या काळामध्ये रेपो रेटमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. आता ०.४ टक्के वाढ केल्यानं रेपो रेट ४.४ टक्के इतका झाला आहे.
गव्हर्नर शक्तिकांत दास पुढे बोलताना म्हणाले की, रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम सर्वत्र जाणवत आहे. युद्धाचा परिणाम होत असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणे निधीनेसुद्धा म्हटलं आहे. गेल्या दोन वर्षात आतापर्यंत पतधोरण समितीच्या जवळपास ११ बैठका झाल्या. यामध्ये पतधोरण समितीने रेपो रेट आधी एवढाच ठेवला होता. मात्र आता तो वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के तर रेपो रेटे हा ४ टक्के इतका होता.
देशातील महागाईने सर्वच क्षेत्रात उच्चांक गाठला आहे. आता रेपो रेट वाढवल्याने बँकांच्या कोटयावधी ग्राहकांवर त्याचा बोजा पडणार आहे. आता बँका ग्राहकांना देण्यात येणाऱ्या कर्जाचा व्याज दर वाढतील. व्याज दर वाढल्यानं ईएमआयमध्ये वाढ होईल. त्यामुळे आधीच्या तुलनेत आता अधिकचा हप्ता कर्जदारांना भरावा लागणार आहे. आधीच महागाईने पोळलेल्या सर्वसामान्य जनतेला आत्ता कर्जाचा हप्ता देखील महागणार असल्याने, जनतेचे एक प्रकारे जगणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी या महागाई सोबत जगायचे तरी कसे ! हा प्रश्न पडला आहे.