भाजप श्रीरामाच्या नावाने राजकारण करत आहे. हाताला नाही काम; पण म्हणा जय श्रीराम, अशी अवस्था मोदी सरकारच्या राजवटीत झाली आहे, अशी टीका रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी आज चिपळूण येथे केली. भाजपच्या राजवटीत मराठी नेत्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील माटे सभागृह आज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये विनायक राऊत यांच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. खासदार राऊत म्हणाले, देशात लोकशाही धोक्यात आली आहे. केंद्रीय यंत्रणेचा मनमानीपणे वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे पाप भाजप करत आहे.
देशातील पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भाजपने तुरूंगात टाकले. भाजपला मुंबईतून शिवसेना संपवायची आहे. मुंबईची आर्थिक लूट करण्यासाठी भाजपला मुंबई महानगरपालिका हवी आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवायचा आहे. मुंबई गुजरातला जोडायची आहे; पण माझा मुंबईतील मराठी माणूस भाजपचे हे स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही. भाजपने मुंबईतून मराठी उमेदवार देण्याऐवजी गुजराती उमेदवार दिले आणि त्यांची उमेदवारी ही तातडीने जाहीर केली. सिंधुदुर्गमधील किराणामालाच्या दुकानातून घेतलेले तांदूळ भाजप कार्यकर्त्यांनी अक्षता म्हणून वाटल्या.
आम्ही त्याचा स्वीकार केला; पण राजकारण केले नाही. मोदी सरकारने जीएसटीच्या माध्यमातून उद्योजकांकडून भरमसाट लूट सुरू केली आहे. या वेळी माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष कदम, रमेश कदम यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व नेते उपस्थित होते.