साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसरा सणाला अनन्य साधारण महत्व आहे. मंगळवारी (ता. २४) दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. हा मुहूर्त साधत जिल्ह्यात ९८४ वाहनांची विक्री झाल्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. यातून कराच्या स्वरूपात आरटीओ कार्यालयाला २ कोटी ९३ लाख २४ हजार ३४४ रुपये महसूल मिळाला. यामध्ये सर्वांत जास्त ७०० दुचाकींची विक्री झाली आहे. यात ३६ इलेक्ट्रिक दुचाकींचा समावेश आहे. लोकांचे राहणीमान उंचावल्याने वाहन खरेदी उद्योगाची चांगलीच चलती आहे.
१०० टक्के कर्ज प्रकरण होत असल्याने आलिशान आणि विविध कंपन्यांच्या वाहनांची जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर जोरदार खरेदी झाली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळालेल्या नोंदणीनुसार, जिल्ह्यात दसऱ्याला ९८४ वाहनांची खरेदी झाली आहे. या वाहनांची आरटीओ कार्यालयात नोंदणी झाल्यानंतर टॅक्सच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयाला २ कोटी ९३ लाख २४ हजार ३४४ रुपये एवढा महसूल मिळाला आहे. प्रत्यक्ष झालेली आर्थिक उलाढाल सुमारे १० ते १२ कोटींच्या दरम्यान आहे. रत्नागिरीत विविध कंपन्यांची शोरूम आहेत. या एजन्सींच्या माध्यमातून महिन्याला ३० ते ४५ च्या दरम्यान वाहनांची विक्री होत असल्याची माहिती कंपन्यांनी दिली.