शहरांचे विद्रुपिकरण करणारे अनधिकृत होल्डिंग्ज, बॅनर हटविण्याचे आदेश न्यायालयाने पालिकांना दिले आहेत. याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना असून राजकीय नेत्यांचेही अनधिकृत बॅनर हटविण्याचे आदेश आहेत. रत्नागिरी पालिकेमार्फत त्याची अंमलबजवणी सुरू असल्याचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सांगितले. बॅनरबाजीचे मोठे फॅड आले असून आता राजकीय निवडणुका, मंत्र्यांचे दौरे, मेळावे, कोणतीही निवडीबरोबर आता वाढदिवासलाही मोठे बॅनर लावण्याचे लोण सर्वंत्र पसरले आहे.
नाक्यानाक्यावर हे बॅनर लागत असून यापैकी अनेक बॅनर अनधिकृत असतात आणि ते हटविले जात नाहीत. त्यामुळे सुंदर शहरांचे विद्रुपिकरण होते. दिवसेंदिवस हे फॅड वाढत गेल्याने न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करत अनधिकृत बॅनर हटविण्याचे आदेश २०१७ मध्ये काढले होते. त्याची अंमलजावणी काही वर्षे झाली. परंतु पुन्हा त्याकडे दुर्लक्ष होऊ लागेले आहे. अनेकवेळा पालिकेची परवानगी न घेता हे बॅनर लावले जातात. काहीवेळा जेवढ्या दिवसाची परवानगी असते त्यापेक्षा अधिक दिवस बेकायदेशीर हे बॅनर झळकत असतात.
न्यायालयाने पुन्हा महापालिका, पालिका, नगरपंचायतीने अनधिकृत बॅनर होल्डिंग्ज हटविण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार पालिका गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बॅनर हटवत आहे. राजकीय नेत्यांचेही अनधिकृत बॅनर हटवा, असे आदेशात म्हटले आहे. रत्नागिरी पालिकेतर्फे याची चोख अंमलबजावणी सुरू आहे. शहरातील अनधिकृत बॅनर हटविले जात असल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सांगितले.