येणारे दिवस सणासुदीचे आहेत. त्या निमित्ताने जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची फसवणूक होणार नाही, याची दक्षता सर्वच विभागांनी घ्यावी. रेल्वे स्टेशनपासून शहरात येण्यासाठी रिक्षा भाड्याची योग्य आकारणी होते का, वजनेमापे तसेच मिठाई, खाद्यपदार्थ याबाबत संबंधित विभागांनी अचानक तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या वेळी सुरवातीला जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी प्रास्ताविक केले. या बैठकीला उपस्थित सदस्यांनी मांडलेल्या सूचनांवर अंमलबजावणी करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी सिंह यांनी सूचना दिल्या.
रत्नागिरी जिल्ह्यातील १६ चायनीज सेंटरमधील खाद्यपदार्थांचे नमूने घेण्यात आल्याचे या वेळी अन्न व औषध विभागाकडून सांगण्यात आले. ते म्हणाले, रिक्षाभाड्याची योग्य आकारणी होते की नाही, हे उपप्रादेशिक परिवहन विभागाने तपासावे. त्याचबरोबर अशा सूचनाही सर्व तालुक्यांना द्याव्यात. अन्न व औषध विभागाने येणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांची तपासणी करावी. विशेषतः मिठाई, खवा अशा पदार्थांची तपासणी आणि एक्स्पायरी डेट याबाबत विशेष दक्षता घ्यावी. मिठाई वजन करताना बॉक्ससह होणार नाही, याची जनजागृती करून तपासणी करावी. महावितरणने नादुरुस्त वीजमीटर बदलून द्यावेत. सरासरी बील पाठवताना योग्य मध्यम बिलाची आकारणी व्हावी. प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक असतो.
या ग्राहकाची फसवणूक होणार नाही, याची जबाबदारी ग्राहकांसह सर्वच विभागांची आहे. त्याबाबत दक्ष आणि जागृत राहून कार्यवाही करावी. या बैठकीला पोलिस उपअधीक्षक नीलेश माईनकर, बीएसएनएलचे सहा. महाप्रबंधक एस. एस. कांबळे, उपनियंत्रक वैद्यमापन शास्त्र द. भि. गोरे, मोटारवाहन निरीक्षक अविनाश मोराडे, अशासकीय सदस्य रमजान गोलदांज, शकील मजगावंकर, सुहेल मुकादम, संजय बामणे, पद्माकर भागवत, सुनील रेडीज, डॉ. विकास मिर्लेकर, चंद्रकांत खोपडकर, अल्लाउद्दीन ममतुले, अनंत रहाटे, मनिषा रहाटे, सुशांत जाधव, डॉ. मिताली मोडक आदी उपस्थित होते.