एसटी महामंडळ हळूहळू कात टाकत आहे. काळानुरुप महामंडळाने आपल्या सेवेत आणि गाड्यांमध्ये -बदल केला आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी व्हावा यासाठी आधुनिक आणि चांगल्या दर्जाच्या गाड्या एसटीच्या ताफ्यात आल्या आहेत. आता लवकरच एसटीच्या ताफ्यात सीएनजी गॅसवर चालणाऱ्या ६० गाड्या दाखल होणार आहेत. त्यापैकी १५ गाड्या सीएनजीच्या बांधणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. एसटी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी ही माहिती दिली. त्यामुळे एसटीचा डिझेलवरील खर्च आणि प्रदूषण कमी होणार आहे. राज्यात नाशिक, मुंबई, पुणे आदी ठिकाणी एसटी महामंडळाच्या सीएनजी गाड्या सुरू आहेत. कोकणात रायगडनंतर लवकरच रत्नागिरीतही एसटीच्या सीएनजी गाड्यांची सेवा सुरू होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ६० सीएनजी गाड्यांचे उद्दीष्ट्य आहे. त्यापैकी पहिल्या १५ गाड्या सीएनजी बांधणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. लवकरच त्या गाड्या येण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाने काळानुरुप बदल करून घेतला आहे. सुरूवातीला लालडबा म्हणून नाव असलेल्या एसटीने परिवर्तन बसेस, मिडी बसेस, एशियाड, लालपरी, विठाई, निमआराम आता आलेल्या आरामदायी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या. एसटीने आर्थिक घडी बसविण्यासाठी वारंवार हे बदल करून घेतले आहेत. कोरोनात तर एसटीचा आर्थिक कणाच मोडला होता. परंतु या गंभीर परिस्थितीवरही मात करण्यासाठी एसटीने कार्गो सेवा सुरू केली. याला तर प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने काही कोटीत एसटीने उत्पन्न मिळविले.
केंद्र व राज्य शासनाने इंधनावरील खर्च आणि वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी सीएनजी गॅसवर चालणाऱ्या गाड्यांना प्राधान्य दिले आहे. दुचाकी, तीन चाकी, चार चाकी गाड्यांवरून आता अवजड वाहनेदेखील सीएनजीवर चालत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळानेही सीएनजी गाड्यांना अधिक पसंती दिली आहे. यामुळे एसटीचा डिझेलवरील होणारा खर्च कमी होणार आहे. धुरामुळे होणारे प्रदुषणही टाळून पर्यावरण संवर्धनाला मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला ६० एसटी गाड्यांना सीएनजी बसविण्यात येणार आहे. त्यापैकी १५ गाड्या सीएनजीच्या बांधणीसाठी पाठविण्यात आल्या असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.