कोकणची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या चिपळूण शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा लवकरच उभा राहणार आहे. या पुतळ्यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून रखडलेल्या पुतळ्याचे काम पावसाळा संपताच पुन्हा जोमाने सुरू झाले असून, काही भागाचे प्लास्टर व सोलिंग, पिचिंगचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. १५ दिवसात नक्षीदार दगड बसवण्यासह शिवसृष्टीच्या कामालाही सुरवात केली जाणार आहे. या चिपळुणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी सातत्याने पुढे येत होती. या मागणीची दखल घेऊन चिपळूण नगर पालिकेमार्फत छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणीच्या हालचाली सुरू झाल्या.
तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी हा पुतळा देण्याचे जाहीर केले. त्यानुसार कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात पुतळा उभारणीचे काम सुरू झाले. मध्यंतरीच्या काळात या पुतळ्याचे काम थांबले होते. या संदर्भात येथील काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नगर पालिकेवर धडक देत या पुतळ्याचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी केली होती. पालकमंत्री सामंत यांनीही या पुतळ्याच्या कामाकडे विशेष लक्ष घातले आहे. चिपळूण दौऱ्यादरम्यान त्यांनी हा पुतळा परिसरात शिवसृष्टी उभारण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यासाठी व सुशोभीकरणासाठी एक कोटीचा निधीची मंजूर केला.
शिवसृष्टीचे काम मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट करणार आहे. त्यानुसार मे महिन्यात प्राध्यापक शशिकांत काकडे आणि विजय सकपाळ यांनी जागेची पाहणी केली आणि आराखडा सादर करण्याबाबत चर्चा केली होती. सध्या या ठिकाणी पुतळा उभारणीचे आणि सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या कामापैकी भिंतींचे काम पूर्णत्वास गेले आहे तर काही भागात प्लास्टर, सोलिंग व पिचिंग केले जात आहे. हे काम लवकरच पूर्ण होणार आहे. त्यानंतर नक्षीदार कामांना सुरवात होणार आहे. त्यात दगड बसवण्यासह शिवसृष्टीच्या कामाचा समावेश आहे.