चिपळूण नगर पालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत भाग घेऊन उत्तम कामासाठी शासनाकडून पुरस्कार प्राप्त केला होता. या अभियानांतर्गत चिपळूण पालिकेला ३ कोटी ४६ लाख ९५ हजार ६६८ इतका निधी शासनाकडून प्राप्त झाला होता. या निधीमधून १२ वाहने पालिकेने खरेदी केली होती. उर्वरित निधीमधून अत्याधुनिक असा बायोमेट्रिक व बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला व त्या कामाला सुरुवात देखील करण्यात आली आहे. १ मार्च २०२३ ला स्वच्छ भारत अभियान २ सुरू होणार असून त्या माध्यमातून देखील चिपळूण पालिकेने तयारी केली आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या साडेतीन कोटी निधीमधून चिपळूण नगरपालिकेने येथील कचरा प्रकल्पावर अत्याधुनिक बायोमेट्रिक प्रकल्प हाती घेतला आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम आता प्रगतीपथावर आले आहे. कचरा वर्गीकरण, विघटन आणि रासायनिक प्रक्रिया करून व भविष्यात बायोगॅसद्वारे वीजनिर्मिती करणारा हा कोकणातील मोठा प्रकल्प ठरणार आहे.
चिपळूण शहरातील शिवाजीनगर येथील डोंगरावर ६ एकर जमिनीत असलेल्या कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी हा अत्याधुनिक प्रकल्प उभारला जात असून बायोमेट्रिक प्रकल्पाची क्षमता २२ टन कंपोस्टिंगची असून बायोगॅस प्रकल्पाची क्षमता ५ टन कंपोस्टिंग इतकी असणार आहे. ओला-सुका कचरा आणि प्लास्टिक असे वर्गीकरण करून त्याचे विघटन व त्यापासून बायोगॅस निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी ८२ लाख ७५ हजार ७४७ रक्कमेची अत्याधुनिक यंत्रसामुग्री येथे आणली असून, दोन वेगवेगळ्या इमारतीदेखील येथे उभारल्या आहेत.
३० मार्च २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करायचा असल्याने प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू ठेवले आहे. तज्ज्ञ मंडळींसह मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे तसेच आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते या ठिकाणी विशेष लक्ष ठेवून आहेत.