रत्नागिरी जिल्ह्यातील स्वच्छ जलसे सुरक्षा अभियानांतर्गत सर्व नळपाणी पुरवठा योजनांचे जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे. तसेच नळपाणी पुरवठा योजनेच्या स्रोतांची मान्सून पश्चात कालावधीतील रासायनिक व जैविक तपासणी केली जाणार आहे. सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानांतर्गत सहभाग घेऊन स्वच्छ जलसे सुरक्षा अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी केले आहे.
जलशक्ती मंत्रालयामार्फत जलजीवन सर्वेक्षणांतर्गत स्वच्छ जलसे सुरक्षा अभियान १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे. याची अमंलबजावणी गुरूवारपासून सुरू झाली आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील नळपाणी पुरवठा योजनांच्या अस्तित्वातील सर्व स्रोतांचे जिओ टॅगिंग, पाणी गुणवत्ता परीक्षण तसेच पाणी नमुने तपासणी व त्यासाठीचे प्रशिक्षण इत्यादी बाबी अभियान स्वरूपात १ महिन्याच्या कालावधीत पूर्ण करावयाच्या आहेत.
हर घर जल या मोबाईलद्वारे अस्तित्वातील सर्व नळपाणी पुरवठा योजना व रेट्रोफिटिंग करण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रमुख स्रोतांचे मोबाईल अॅपद्वारे जिओ टॅगिंग पूर्ण केले जाईल. स्वच्छ जलसे सुरक्षा अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक नळपाणी पुरवठा योजनेच्या स्रोतांची मान्सूनपश्चात कालावधीतील रासायनिक व जैविक तपासणी पूर्ण केली जाईल. अभियानांतर्गत कीटद्वारे व त्याच्या वापरासाठी महिलांना प्रशिक्षित करून कीटद्वारे नियमित पाणी गुणवत्ता तपसाणी पूर्ण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे तसेच शाळा व अंगणवाडी यांना पुरवण्यात आलेल्या सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजनांचे जिओ टॅगिंग करण्यात येणार असून त्यांची प्रयोगशाळा तसेच रासायनिक व जैविक तपासणी करण्यात येणार आहे. या अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.