‘इडा पिडा टळो…. बळीचं राज्य येवो…’ असे गाऱ्हाणे घालत आज घरोघरी देवदिवाळी साजरी करण्यात आली. पिढ्यानपिढ्यांची चालत आलेली प्रथा आजही खायच्या पानाचे विडे ठेवून स्मरण करण्यात आले. कोकणातील वाडीवस्तीवर बुधवारी (ता. १३) दिवसभर ही प्रथा जपण्यात आली. कोकणात नरक चतुर्थशीपेक्षा त्यानंतर २१ दिवसांनी येणाऱ्या देव दिवाळीच्या सणाला मोठे महत्व आहे. देवदिवाळीला हजारों वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या कृषीप्रधान सम्राट बळीराजाचे कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यात गावोगावी स्मरण केले जाते. बळीराजा गोरगरिबांचे कल्याण करणारा राजा होता. त्याची आठवण म्हणून या दिवशी विडे ठेवण्याचा किंवा विडे भरण्याची पिढ्यान्पिढ्या चालत आलेली परंपरा इथल्या शेतकरी वर्गातून आजही जपली जात आहे.
केरळमध्ये ओणम सण बळीराजाच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जातो. त्याप्रमाणे कोकणात थेट बळीच्या राज्याची मूर्त संकल्पनाच देवदिवाळीच्या दिवशी शेतकरी आपल्या घरात गादीवर विड्यांची मांडणी करून उभी करतात. या वेळीही ‘इडा-पीडा टळो..’ अशी आर्त साद शेतकरी वर्ग घालताना पहायला मिळाला. हे विडे देवापूढे ठेवले जातात. वडील-थोर, ग्रामस्थ यांना वाटून त्यांचा सन्मान केला जातो. ज्याप्रमाणे घरात विडे भरण्याचा कार्यकम होतो, त्याप्रमाणे सारे गावकरी गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरातही जमून सामूदायिकरित्या विडे भरण्याचा कार्यक्रम यादिवशी साजरा झाला.