रत्नागिरी हि रत्नांची खाण आहे. अनेक घटकांमध्ये दैदीप्यमान कामगिरी करून हि मानवी रत्ने जिल्ह्याचे नाव उंचावत असतात. विविध खेळ, अभ्यास, परीक्षा, विविध क्षेत्र यामध्ये कायमच रत्नागिरीकरांचा दबदबा पाहायला मिळतो आहे. ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत अनेक निष्टावंत खेळाडू निर्माण होत असतात. गरज असते ती केवळ योग्य मार्गदर्शनाची. अनेक खेळांमध्ये उज्वल यश संपादन करण्यामध्ये विशेष करून ग्रामीण भाग आघाडीवर आहे.
महाराष्ट्राच्या कबड्डी संघात दापोली तालुक्यातील कोळथरे गावची सानिका भाटकर हिची निवड झाली असून या संघात ती खेळणार आहे. या गावाला प्रथमच हा मान प्राप्त झाला असून, कोळथरे येथील दुर्गामाता क्रीडामंडळाचा मुलींचा कबड्डी संघ आता संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झाला आहे. दापोली तालुक्यासाठी विशेष आनंदाची बाब म्हणजे, नुकत्याच झालेल्या निवड चाचणीमध्ये दुर्गामाता क्रीडामंडळाची खेळाडू सानिका भाटकर हिची महाराष्ट्राच्या संघातून खेळण्यासाठी निवड झाली आहे. ६वी कुमार गट मुले-मुली फेडरेशनची स्पर्धा मदुराई, तामिळनाडू येथे जानेवारी महिन्यात होत असून, या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघात शाळेत शिकणारी, आमच्या क्रीडामंडळाची खेळाडू चमकणार आहे. ही आमच्यासाठी विशेष आनंदाची बाब असल्याचे क्रीडामंडळाचे अध्यक्ष दीपक महाजन यांनी नमूद केले.
आज पर्यंत अनेकदा विविध वयोगटातून, कोळथरेचे अनेक कबड्डी खेळाडू जिल्ह्याला, राज्य स्पर्धेत खेळल्या आहेत व त्यांनी स्वतःची छाप उमटवलेली आहे. क्रीडामंडळाचे कबड्डी प्रशिक्षक सचिन चव्हाण यांची प्रचंड मेहनत या सर्व मुलींना तयार करण्यासाठी अखंड सुरू असते. रोजचा व्यायाम, रोजचा मैदानी सराव, कौशल्य विकास आदींच्या माध्यमातून चव्हाण आपल्या संघाला अधिकाधिक तरबेज बनवत आहेत.