जिल्ह्यात कोरोना काळानंतर मोठ्या प्रमाणात वाहनचा संख्येमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक नियम धाब्यावर बसवणाऱ्यांचे देखील प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी दिल्यामुळे अपघाताच्या घटना घडताना दिसतात. तर काही वेळा वाहन बेदरकारपणे चालवून अपघातास कारणीभूत ठरणारी तरुणांचे धूम स्टाईल गट देखील वाढत चालले आहेत. पालकानी देखील आपल्या मुलांना योग्य वयात योग्य सवयी लावणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात त्याला त्याचा उपयोग होईल.
वाहतुकीचे नियम देखील आता शासनाने कडक केले असून, गेल्या ११ महिन्यांत आरटीओ कार्यालयाकडून २७४ जणांचे वाहन परवाने निलंबित केले आहेत. आणखी २५८ जणांच्या वाहन परवान्यांबाबत प्रक्रिया सुरू आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास वाहन परवाना निलंबित होतोच, पण त्याचबरोबर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आकारण्यात येणार्या दंडाची रक्कमही भरावी लागते. सध्या दंडाची रक्कम ऑनलाईन माध्यमाच्या आधारे पाठवण्यात येते, परंतु, अनेक जण ती रक्कम भरणा करण्याकडे देखील दुर्लक्ष करताना आढळतात.
अल्पवयीन मुले वाहन चालविताना अनेक जीवघेणे अपघात होतात. हे धोके लक्षात घेवून नागरिकांनी वाहतुकीच्या नियामांचे पालन करून वाहन चालवावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी केले आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नियम तोडणार्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ या १९ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील २७४ परवाने निलंबित केले आहेत. वाहतूक नियम धाब्यावर बसवून वाहन चालविण्याचे हे परिणाम आहेत. त्यामुळे पालकांनी देखील मुलांचे कोणते हट्ट पुरवायचे त्याकडे विचारपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.