कोकण रेल्वे मार्गावरील सर्वसामान्यांच्या हक्काच्या दिवा- सावंतवाडी एक्सप्रेस व रत्नागिरी- दिवा पॅसेंजर या दोन्ही गाड्यांना जोडलेले वातानुकूलित डबे कायम ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. १५ सप्टेंबरपासून धावणाऱ्या दोन्ही गाड्या महिनाभराच्या कालावधीसाठी वातानुकूलित डबे जोडून धावणार होत्या. १५ ऑक्टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दोन्ही गाड्या प्रत्येकी दोन वातानुकूलित डब्यांसह धावणार असल्याने कोकणवासीयांना आणखी दिलासा मिळाला आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १०१०५/१०१०६ क्रमांकाच्या दिवा- सावंतवाडी एक्सप्रेस तसेच ५०१०७ / ५०१०८ क्रमांकाच्या दिवा पॅसेंजर या गाड्यांना एसी चेअर कारचे डबें जोडण्यात यावेत, यासाठी कोकण विकास समितीने रेल्वे प्रशासनाकडे आग्रह धरला होता. या मागणीची रेल्वे प्रशासनाने दखल घेत तसा प्रस्तावही रेल्वे बोर्डाकडे पाठवत या प्रस्तावला हिरवा कंदील दिला होता. त्यानुसार १५ सप्टेंबरपासून दोन्ही गाड्या प्रत्येकी दोन वातानुकूलित डब्यांच्या धावणार आहेत. गणेशोत्सवात वातानुकूलित डब्यांच्या धावलेल्या दोन्ही गाड्यांनी चाकरमान्यांनी भरभरून पसंती दिली होती. अजूनही दोन्ही वातानुकूलित डब्यांच्या फेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे.