विधानसभा निवडणुकीत कितीही आडवे आले तरीही गोळपचे ९५ टक्के मतदान शिवसेनेच्या धनुष्यबाणालाच होईल. माझ्या मतदारसंघात मुस्लिम बांधवांना कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागणार नाही, असा शब्द पालकमंत्री म्हणून देतो. आपल्यात गैरसमज पसरवले जात आहेत, त्याला बळी पडू नका. जोपर्यंत महिलाभगिनी, बुजूर्ग आणि सर्व मतदारांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे तोपर्यंत कोणताही मायचा लाल मला पाडू शकणार नाही, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी स्थानिक ग्रामस्थांसह कार्यकर्ते, शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री सामंत म्हणाले, या कार्यक्रमाला मला यायला उशीर झाला. बाहेर पाऊस पडतोय तरीही आपले नेतृत्व येणार म्हणून कोणीच खुर्चा सोडल्या नाहीत, ही माझ्या कामाची पोहोचपावती आहे. माझ्या मतदारसंघात मुस्लिम बांधवांना कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागणार नाही. आपण ज्यांना भरभरून मतदान केलात ते सांगायला घाबरतात. आम्हाला मुस्लिम आणि दलित बांधवांची मते मिळाली.
गोळप गावाच्या विकासासाठी रस्ते, पाखड्या, पाणी अशी सगळी विकासकामे करून देण्याचे भाग्य तुमच्यामुळे मिळाले. माझ्याबरोबर सर्व मतदारांचे आशीर्वाद आहे. त्यामुळे कितीही येऊ देत त्यांना झोपवल्याशिवाय शांत बसणार नाही. जनतेच्या न्याय हक्कासाठी, विकासासाठी मी काम करतोय आणि पुन्हा तुमची सेवा करण्याची संधी मला द्याल. त्यासाठी आशीर्वाद घ्यायला मी गोळपमध्ये आलो आहे. सरकारने आणलेल्या सर्व योजना गावागावांत पोहोचविण्याचे आदेश पालकमंत्री सामंत यांनी दिले आहेत. या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख बाबू म्हाप, कांचन नागवेकर, विनया गावडे, नंदा मुरकर, सरपंच तांडेल, तुषार साळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.