रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील २३ हजार मते चोरली किंवा फसवणूक केल्याचा आरोप माजी आमदार बाळ माने करत आहेत. म्हणजे हा रत्नागिरीतील मतदारांचा अपमान आहे. २००४ पासून आतापर्यंत चार निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला आणि पराभव लपवण्यासाठी माने मतदारांना दोष देत आहेत, असा पलटवार पालकमंत्री उदय सामंत यांनी केला. सामंत म्हणाले, शहरातील खड्ड्यांचा प्रश्न पंधरा दिवसात मार्गी लागेल. त्यासाठी नाशिक येथील तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. एवढेच नाही, तर स्मार्ट सिटी अंतर्गत १० कोटी रुपये खर्च करून शहरातील अंतर्गत रस्ते देखील काँक्रिटीकरण केले जाणार आहे. संपूर्ण शहरातील काँक्रिटीकरण होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विमानतळ येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, कालच रत्नागिरीत २३ हजार मते बनावट असल्याचा आरोप माजी आमदारांनी केला. हा तमाम मतदारांचा अपमान आहे.
२००४ ला मतदान चोरी झाली का? ते पडले तेव्हा. २००९ला मतदान चोरी झाली का? ते पडले तेव्हा. २०१४ ला मतदान चोरी झाली का? ते पडले तेव्हा म्हणजे चार निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला तेव्हा मतदान चोरी झाली का? त्यांनी आपला पराभव लपवण्यासाठी मतदारांना दोष देऊ नये. मी त्यांचे अभिनंदन करतो की, त्यांनी पहिल्यादा खड्यांसारखा सामाजिक प्रश्न उचलला; परंतु आम्ही त्यांना तिथेही बोलायला संधी देणार नाही. पाऊस उघडल्यानंतर नाशिक येथील नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील खड्डे १५ दिवसांमध्ये भरले जातील.

