एमटी पार्थ या तेलवाहू जहाजाच्या अपघातानंतर समुद्रात प्रदूषणाचे संकट गड़द होताना दिसत आहे. आज तेलाचा तवंग मालवण ते विजयदुर्ग दरम्यान समुद्रात ७-८ नॉटिकल मैलपर्यंत पसरल्याचे तटरक्षक दलाच्या पाहणीत स्पष्ट झाले. वेंगुर्ले रॉक्सच्या दिशेने दक्षिण-पश्चिम भागात तवंग पुढे सरकत आहे. ही माहिती रत्नागिरी तटरक्षक दलाने दिली. प्रशासनाने किनारी भागात सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे.
विजयदुर्ग ते देवगडसमोरील खोल समुद्रात दुर्घटनाग्रस्त झालेल्या तेलवाहू जहाजातून तेल गळती सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या किनारपट्टी भागात सुरक्षितता म्हणून प्रशासनाने आज बैठक घेतली. त्यात प्रांताधिकारी राजमाने, तटरक्षक दलाचे डेप्युटी कमांडर सचिन सिंह उपस्थित होते. यावेळी समुद्रात तेलगोळे आढळल्याची माहिती पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी दिली. सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्या उपाययोजना कराव्यात किंवा कशाप्रकारे काळजी घ्यावी, या संदर्भात मार्गदर्शन केले आहे.
तेल वाहतूक करणारे एमटी पार्थ जहाज काही दिवसांपूर्वी विजयदुर्ग येथे अपघातग्रस्त झाले. जहाज तीन दिवसांपासून समुद्रात बुडालेल्या अवस्थेत आहे. घटनास्थळी काही तज्ज्ञांचे पथक २४ तास काम करीत आहे. तवंग थेट किनाऱ्यावर येऊ न देता त्याला समुद्रातूनच बाहेर कसे काढता येईल आणि तेल किनाऱ्यावर आलेच तर त्याला कशा प्रकारे वाळूतून सुरक्षितरीत्या बाहेर काढावे, या संदर्भात प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे. संभाव्य परिस्थितीवर मात करण्यासाठी भारतीय तटरक्षक दल सज्ज आहे.