गेल्या आठवडभरात जिल्ह्यात ठिकठिकाणी हलकासा पाऊस झाला. त्या भरवशावर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; मात्र अद्याप पाऊस सक्रिय झालेला नाही. दिवसभर रखरखीत ऊन असते. जमिनीत अद्याप ओलावा निर्माण झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी ही द्विधा मनःस्थितीत सापडला असून, वरुणराजाला साद घालत असल्याचे चित्र आहे. येथील कृषी विभागाने पेरणीची घाई करू नये, अशी सूचना शेतकऱ्यांना दिली आहे. बिपरजॉय वादळामुळे मान्सून सक्रिय होण्याचे वेळापत्रक बदलले आहे. वादळी वारे शमल्याशिवाय मोसमी पाऊस सक्रिय होण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. २३ जूननंतर पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जमिनीत ओलावा नसताना कोकण किनारपट्टी भागातील शेतकरी पेरण्या करण्यास धजत नाहीत. काही ठिकाणी काहीसा हलका पाऊस पडत असल्याने सध्या शेतकऱ्यांची द्विधा मन:स्थिती झाली आहे. दरवर्षी रोहिणी नक्षत्रावर धूळवाफेच्या पेरण्या केल्या जातात.
मृग नक्षत्रावर मात्र उर्वरित पेरण्यापूर्ण केल्यात जातात. त्यानंतर भाताची रोपे २० ते २१ दिवसांची झाल्यानंतर लागवड प्रक्रियेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. काही शेतकऱ्यांनी या हलक्या पाऊस पडल्याने भातपेरणी केली आहे. त्या शेतकऱ्यांच्या शेतातील रोपे उन्हाच्या रखरखीतपणामुळे उगवून येतील का, अशी शंका निर्माण झाली आहे. सध्या पावसाअभावी जिल्ह्यात ३० टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित पेरण्या करताना शेतकऱ्यांची लगबग करू नये, असा सल्ला कृषीविभागाने दिला आहे. २२ जुलैपासून आर्द्रा नक्षत्र सुरू होत आहे. आर्द्रातही मान्सूनचा कल असाच राहिला तर खरीप क्षेत्रातील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर्षी प्रथमच रोहिणी व मृगनक्षत्र कोरडे गेले आहे. अद्याप पावसाचा पत्ता नसल्याने शेतीचा हंगाम लांबण्याचा धोका आहे. शेतकऱ्यांनी या सगळ्याचा अंदाज घेऊनच पेरणी करावी. यावर्षी जुलैमध्ये पेरणी कामे पूर्ण होण्याची चिन्हे आहेत; मात्र पावसाची आस लागून राहिलेल्या शेतकऱ्यांचा नजरा आकाशाकडे लागलेल्या आहेत.