मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. डिसेंबर अखेर किमान एक लाईन सुरू करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. या कामामुळे जुना मार्ग पूर्णतः खड्डयात गेला आहे. वाहनधारकांना कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत. त्यांना दिलासा मिळावा यासाठी जुन्या मार्गावरील खड्डे भरणे आणि डांबरीकरणाचे काम युद्धपातळवीर हाती घेण्यात आले आहे.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. त्यानुसार खड्डे भरणे व डांबरीकरणाची कामे करण्यास सुरवात केली आहे.
बहुतांशी किमीपर्यंत खड्डे भरण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील परशुराम घाट ते सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत एकूण २६६ किलोमीटरपर्यंतचा रस्ता रत्नागिरी नॅशनल हायवे कार्यालयाच्या अखत्यारित येतो. यापैकी बराचसा भागात चौपदरीकरण झालेले आहे. ४६ किलोमीटरपर्यंतचा भाग खड्डेमय होता. महामार्गाचे चौपदरीकरण होण्यापूर्वी खड्डे भरण्याची कामे तसेच काही ठिकाणी पूर्णतः डांबरीकरणाची कामे करावी, अशी मागणी होती. त्यानुसार महामार्गावर खड्डे भरणे आणि डांबरीकरणाची कामे सुरू आहेत.