कोकण रेल्वे मार्गावर शनिवारपासून (ता. १०) पावसाळी वेळापत्रक लागू झाले असून नवीन वेळेनुसार गाड्या धावत आहेत. त्याचा फटका पहिल्याच दिवशी रत्नागिरीतून सायंकाळी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसला. आरक्षित तिकिटावर जुनी वेळ नोंदवलेली असल्याने गाडी आधीच निघून गेली. यावरुन प्रवाशांनी रत्नागिरी रेल्वेस्थानकावर उपस्थित अधिकाऱ्यांना विचारणा केली; मात्र अपेक्षित उत्तर न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पावसाळी वेळापत्रकानुसार दर वर्षीप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या धावू लागल्या आहेत. सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास मडगावहून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस पावसाळी वेळापत्रकानुसार आधीच दाखल झाली.
प्रवाशांनी गाडीचे आरक्षण करताना त्या तिकिटावर पावसाळी वेळापत्रकानुसार वेळ नव्हती. या गोंधळात पन्नासहून अधिक प्रवाशांची गाडी चुकली. त्या प्रवाशांनी रेल्वेस्थानकावरील तिकिट घराकडे धाव घेतली. तेथील अधिकाऱ्यांनीही तिकिटावरील वेळेची नोंद ही वरिष्ठ पातळीवरून होत असल्याचे सांगत प्रवाशांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.