रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये गुलाबी थंडीला सुरुवात झाली असून, कोकणातील हापूस आंब्याला पूरक मोसम सुरु झाला आहे. थंडीमध्ये झाडाला चांगला मोहोर येत असून, हळूहळू मोहोर बहरायला सुरुवात झाली आहे.
सध्या तालुक्यात थंडीचे आगमन झाले असल्याने हापूस आंब्याला पोषक असे वातावरण केळशी परिसरात निर्माण होत आहे. ऐन दिवाळीच्या मुहुर्तालाच पाउस परतला असून, वातावरणात थंडीची लहर जाणवू लागली असल्याने आंबा बागायदारांच्या आंब्याच्या पिकाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या थंडीमुळे काही ठिकाणी आंबा कलमांना मोहोर येऊ लागल्याचे चित्र आहे. पण या वेळेस उशिरापर्यंत झालेल्या पावसाचा परिणाम पाहता अजूनही आंबा हंगाम नक्की कधी सुरु होणार हे स्पष्ट होण्यासाठी बागायदारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अनियमित पावसाच्या वातावरणामुळे आंबा, काजू, बागायतदारांसह अन्य पीक घेणारे यांची आर्थिक समीकरण विस्कळीत झाली आहे. अनेक वेळा अचानक वादळी वाऱ्यासह जोराच्या पावसाचे सावट उभे राहते. त्याचा परिणाम आंबा पिकावर जाणवतो. यंदाचा हंगाम तोंडावर आलेला असून जिल्ह्यात पाऊस सुरूच होता. परंतु, आता त्या थंडीला प्रारंभ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे हापूस आंब्यासाठी पोषक वातावरण सध्या निर्माण झाले आहे. पाऊस गेल्याने आता येथील बागायतदार बागांची साफसफाई व छोट्या झाडांवरील मोहोर टिकवण्यासाठी फवारणी सुरू करण्यात आली आहे.
यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे आंब्याची झाडे मोहरण्याऐवजी झाडांना पुन्हा नवनवीन पालवी फुटायला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास यंदाचा हंगाम पुढे जाण्याचे संकेत मानता येतील. त्यामुळे बागायदारांचा खर्चामध्ये वाढ होणार असल्याचे स्पष्ट होते आहे. सध्या वातावरण कोरडे झाल्याचा अनुभव बागायतदार घेत आहेत.