राज्य व केंद्र शासनाने पीकविमा योजनेचा हप्ता भरलेला नसल्यामुळे आंबा व काजू उत्पादक शेतकरी आजतागायत विम्याच्या रकमेपासून वंचित आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी ९९ कोटी ५३ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईपासून वंचित असून, या पीक विम्याची रक्कम तातडीने देण्यात येणार का? तसेच हवामानाचा अहवाल येण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या १८ नवीन महसूल मंडळामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन होणार का? अशी विचारणा आमदार राजन साळवी यांनी सभागृहात केली.
साळवी म्हणाले, ‘कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीबाबत तसेच बागायतदार फळपीक विमा योजनेंतर्गत मिळणाऱ्या विमा रकमेपासून वंचित असल्याबाबत अधिवेशनामध्ये लक्षवेधी उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. या वेळी कोकणातील इतर आमदारांनीही त्यामध्ये सहभाग घेतला. फळपीक विमा योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील २४ हजार ४६८ आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी व ४६ हजार ६५० काजू उत्पादक शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे.
या योजनेचा लाभ मिळणार असल्याची अंतिम यादी तयार झाली आहे; परंतु यावर उत्तर देताना राज्याचे कृषिमंत्री उपस्थित नसल्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधी कोकणासाठी महत्त्वाची असून, कोकणातील आमदारांशी चर्चा करून कृषिमंत्र्यांशी बोलले असता त्यांनी संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे; तसेच आंबा बागायतदारांच्या व्याजाची रक्कम मिळण्याच्या प्रस्तावावर कृषिमंत्र्यांनी सही केली असून, येत्या काही दिवसांत त्यांना रक्कम प्राप्त होईल, असे स्पष्ट केल्याचे आमदार साळवी यांनी सांगितले.’