गुहागर जवळील वेळणेश्र्वरच्या समुद्रात शुक्रवारी संध्याकाळी मेरुमंडल येथील खडकाळ भागात एका लाटेमुळे एक मच्छिमार नौका उलटली आणि त्यातील तीन खलाशी समुद्रात पडले. यामुळे मोठा बाका प्रसंग ओढवला होता. गुहागर तालुक्यातील कोंडकारुळचे तीन मच्छिमार यशवंत गंगाजी झर्वे वय ५८, रा. जांभुळवाडी, संजय लक्ष्मण जागकर वय ४०, रा. लक्ष्मीनगर आणि विलास लक्ष्मण जागकर वय ६२, रा. नामदेववाडी यांनी आरडाओरड सुरू केली.
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर समुद्रात बुडालेल्या मासेमारी नौकेतील तीन मच्छिमार दैव बलवत्तर म्हणून बचावल्याची माहिती समोर आली आहे. हा सगळा प्रकार गुहागर पोलीस स्थानकाचे पोलीस कादवडकर यांच्या लक्षात आल्याने तात्काळ प्रसंगावधान दाखवत त्यांनी धावपळ केली. यामुळे हे तीन खलाशी बचावले आहेत.
हे तीन खलाशी शुक्रवारी दुपारी १ वाजता छोटी मच्छिमार नौका घेवून वेळणेश्र्वरच्या दिशेने मच्छिमारीसाठी निघाले होते. दरम्यान त्यांची नौका वेळणेश्र्वर येथील मेरुमंडल या खडकाळ भागात आली. एका मोठ्या लाटेने नौका अचानक पलटी झाली. यामुळे ते समुद्रामध्ये पडले. पाऊस आणि जोराचा वारा यामुळे जीव वाचवण्यासाठी ते मदतीसाठी ओरडू लागले.
गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी गुहागर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश कादवडकर हे सहकाऱ्यांसह समुद्र किनारी उपस्थित होते. समुद्रात मच्छिमारांनी केलेला आरडाओरडा कादवडकरांच्या लक्षात आला. तातडीने त्यांनी वेळणेश्र्वरचे सरपंच चैतन्य धोपावकर यांना कळविले. धोपावकर यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेतली. आणि या तिन्ही मच्छिमारांना सुखरुप समुद्रकिनाऱ्यावर आणले. पोलीस कर्मचाऱ्यांने दाखवलेल्या सतर्कतेमुळे आज या तिघांचे प्राण वाचले.

