पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे होणारी जीवितहानी व अन्य स्वरूपाचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासन आतापासूनच सतर्क झाले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर येथील तहसील कार्यालयामार्फत आपत्ती व्यवस्थापनांतर्गत चिपळूण तालुक्यातील १३ गावांतील २५. ठिकाणी असलेल्या पूर/दरडग्रस्त भागातील तब्बल ४५५ कुटुंबांना तात्पुरत्या स्थलांतरित होण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. यातील १०१ कुटुंबांनी या नोटिसांचा स्वीकार केला नाही, तर १३ घरे बंद असल्याने प्रशासनाची नोटीस त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. २२ जुलै २०२१ च्या अतिवृष्टीत महापुराचा मोठा फटका हजारो कुटुंबांना बसला तर दसपटीसह अनेक गावांमध्ये दरड कोसळणे, डोंगराला भेगा जाणे, भूस्खलन आदींसारखे प्रकारही घडले. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर वेळीच खबरदारी घेत प्रशासनाने संभाव्य पूर/दरडग्रस्त भागातील कुटुंबांना नोटिसांद्वारे तात्पुरत्या स्थलांतर होण्याच्या सूचना केल्या आहेत.
यामध्ये, पेढांबे गावातील पेढांबे रिंगीचीवाडी येथील ३, येगाव येथील १०, कामथे खु. येथील १४, कापसाळ येथील ३१, तिवरे गावठाणवाडी येथील २०, फणसवाडी येथील ३०, तिवडी- उगवतवाडी येथील १४, गोवळकोट बौद्धवाडी २९, मिरजोळी जुवाड माळेवाडी १३, पेढे ३६, परशुराम ४९, कळकवणे ऐनाडवाडी ११, रिंगीचीवाडी ८, खलिफावाडी १२, कोळकेवाडी तांबेवाडी २०, हसरेवाडी २९, बौद्धवाडी ३७, खरवाचवाडी १८, नागावे २, पोफळी ऐनाचे तळे २४, कर्जावाडा १४, कासारखडक २ अशा कुटुंबांचा समावेश आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापनांतर्गत ३० जूनला चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आढावा बैठक झाली.
प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीत चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्यासह चिपळूण, गुहागर व खेड तालुक्यातील विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते. या बैठकीत नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नेमणूक करण्यात आलेल्या १३ विविध पथकांकडून आढावा घेण्यात आला. पावसाळ्यात सर्वांनी सतर्क राहावे, अशा सूचना देण्यात आल्या. जेथे नुकसानीसंदर्भात माहिती मिळेल, मदतीची गरज भासेल तेथील नागरिकांच्या अडचणी दूर होईपर्यंतचे अपडेट देण्यात यावेत, अशाही सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या.
पावसाळ्यात नियंत्रण कक्ष सूचना पथक, दक्षता पथक, पूरपातळी पथक यंत्रसामग्री पथक, अन्नधान्य भोजन पथक, पाणीपुरवठा पथक, विद्युतपथक, साफसफाई आरोग्यपथक, औषधोपचा रक्तपुरवठा व रुग्णवाहिका पथक निवारा पथक, वाहतूक पथक, दूरध्वनी व इंटरनेट सुविधापथक, समन्वय शिष्टाचार पथक कायम कार्यरत राहणार असून त्यांची जबाबदारी विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांवर सोपवली आहे.
१३ पथके विभागवार काम करणार – चिपळूण तहसील कार्यालयात तालुक्याचे नियंत्रण कक्ष असणार आहेत, तर ही १३ पथके विभागवार काम करतील. याशिवाय ज्या ठिकाणी जेवढे धोकादायक ठिकाणे आहेत, त्या गावामध्ये एक नोडल अधिकाऱ्याचीही नेमणूक करण्याचे काम सुरू आहे, तर नद्यांच्या पाणीपातळीत होणारी वाढ, कोयना, कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणारे पाणी याचेही कायम अपडेट ठेवले जाणार आहेत, तसेच तालुक्यातील प्रत्येक धरण परिसरात एक कर्मचारी तैनात असणार आहे, या सर्व गोष्टींवर चर्चा झाली.