मुंबई-गोवा महामार्गावर सणासुदीच्या हंगामामध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने, लहान मोठ्या अपघातांची मालिकांचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. खारेपाटण चेकपोस्ट नजीकच्या पुलावर कणकवली कडून रत्नागिरीकडे जात असताना कंटेनर ८० ते ९० फूट नदीपात्रात खाली कोसळला आहे. सदर अपघाताचे ठिकाणी हजर असलेले खारेपाटण चेकपोस्ट वरील पोलीस अंमलदार उद्धव साबळे आणि वनविभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांनी तातडीने मदती करीता धाव घेऊन अपघातातील दोन जखमींना तात्काळ अपघातग्रस्त ट्रकमधून बाहेर काढुन, उपचाराकरीता खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सरस्वती कोळी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले आहे.
घडलेल्या घटनेमध्ये खारेपाटण चेकपोस्ट जवळील नदी पात्रात कणकवली कडून रत्नागिरीकडे जाणारा भारत बेंज कंपनीचा कंटेनर क्र. एम.एच.४७ -ऐ.एस. २२६६ हा ९० फूट खोल नदीपात्रात कोसळला असून या कंटेनर मधील दोघे जण जागीच गतप्राण झाले आहेत, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीद्वारे मृत्युमुखी पडलेल्या दोघांमधील एकाची ओळख पटली आहे. तर एकाची ओळख अजून पटलेली नाही. त्याच प्रमाणे एवढ्या उंचीवरून कंटेनर खाली नदीपात्रात कोसळल्याने, आणि काही प्रमाणात चिखल आणि गाळ असल्याने तो रुतला आहे त्याप्रमाणे नदीमध्ये पाण्याच्या प्रवाहाचा जोर सुद्धा वेगवान असल्यामुळे कंटेनर बाहेर काढण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे कंटेनर लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पाण्याचा प्रवाह वाढला तर, तो कंटेनर अजून खोलवर रुतण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.