महामार्गावर सततच्या घडणाऱ्या अपघातामुळे अनेकांनी जीव गमवले आहेत. वाहनंचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, त्यावर काही तरी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जनतेतून होत आहे. तीव्र उतारावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन अपघातग्रस्त होते. वाहनाचे आणि वाहनातील सामग्रीचे नुकसान होते ते वेगळेच.
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील त्या अवघड वळणावर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्ग बांधकाम विभागाने आता आणखी दोन गतिरोधक टाकले आहेत. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या गतिरोधकांची संख्या आता १२ झाली आहे. अपघातग्रस्त वाहने ज्या भिंतीवर आदळतात त्या संरक्षक भिंतीवर आता जुने टायर लटकवण्यात आले आहेत. घाट उतरणार्या एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यास ते वाहन संरक्षक भिंतीवर आदळून भिंत तुटू नये यासाठी बांधकाम विभागाने ही खबरदारी घेतली आहे.
भोस्ते घाटातील त्या अवघड वळणावर आजपर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत. या अपघातात काहींचा बळी तर काही कायमचे जायबंदी झाले आहेत. या वळणावर वारंवार होणारे अपघात लक्षात घेता या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र बांधकाम विभाग थातुरमातूर उपाययोजना करून वाहन चालक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप प्रवासी आणि वाहन चालकांमधून केला जात आहे. महामार्गाचे काम पूर्ण होवून जेव्हा हा रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला तेव्हापासून या वळणावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. दर दोन दिवसाआड घाट उतरणारी अवजड वाहने या वळणावर अपघात ग्रस्त होत असल्याची माहिती समोर आली आहे.