तळकोकणातून येणाऱ्या सर्वच गाड्या भऋण येत असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच स्थानकांवर प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले होते. खेड स्थानकावर मंगळवारी रात्री डब्यांचे दरवाजे न उघडल्यामुळे आतील आणि बाहेरील प्रवाशांमध्ये तु तु मै मै झाली होती. परंतु, वेळीच रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे त्या वादावादी निवळल्या. गाड्यांमध्ये बसण्यासाठीच सोडा, तर दोन पाय टेकवून उभे राहायलाही जागा नव्हती.
कोकण रेल्वेमार्गावर माणगाव येथे मंगळवारी गणपती विशेष रेल्वेगाडीचे डबे न उघडल्यामुळे संतप्त प्रवाशांनी दगडफेक केली. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सायंकाळनंतर सर्वच रेल्वेस्थानकांवरील बंदोबस्त वाढवण्यात आला. रत्नागिरी स्थानकातही सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. अनुचित प्रकार टाळण्यासाठी रेल्वे पोलिसांबरोबर स्थानिक पोलिसांचे पथक नियुक्त केले होते. यामध्ये एक उपनिरीक्षक आणि दोन कॉस्टेबलचा समावेश करण्यात आला होता. सर्व डब्यांचे दरवाजे उघडे राहतील याची विशेष काळजी रेल्वे पोलिस घेत होते.
कोरोनाच्या दोन वर्षानंतर या वर्षी अधिकच चाकरमानी कोकणात दाखल झाल्याने परतीच्या प्रवासावेळी कोकण रेल्वे पूर्णतः भरून मुंबईकडे रवाना होत होत्या. सायंकाळी आठ वाजल्यानंतर दोन गणपती विशेष गाड्या मुंबईकडे रवाना झाल्यामुळे तुतारी, कोकणकन्या या दोन गाड्यांवरील भार कमी झाला होता. संगमेश्वर, चिपळूण, खेड स्थानकावरही याच पद्धतीने नियोजन करण्यात आले होते. आरक्षित डब्यांमध्ये अनेक प्रवासी बसून राहिल्यामुळे तिकीट आरक्षित असलेल्या प्रवाशांना चढता येत नाही. त्यामधूनच माणगाव, खेड स्थानकावर गोंधळ निर्माण झाला होता. हे लक्षात घेऊन पोलिसांनी वेळीच पाऊले उचलली होती; त्यामुळे मंगळवारी कोणताही अनुचित प्रकार घडून आला नाही.