मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणांतर्गत परशुराम घाटातील धोकादायक दुसऱ्या लेनचे काम पून्हा सुरू करण्यात येणार आहे. धोकादायक परिसरातील दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच त्या ठिकाणी काँक्रीटीकरण केले जाणार आहे. त्यामुळे काही महिन्यात चौपदरीकरण पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गेली १७ वर्षे रखडले. ‘नकटीच्या लग्नात सतरा विघ्नं’ याप्रमाणे हे काम अजूनही पूर्णत्वास जात नाही. परशुराम घाटात तर अनेक अडथळ्यांचे डोंगर उभे राहिले. त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजेच टेकडीवर आणि दरीच्या पायथ्याला नागरी वस्ती असल्याने आणि पावसाळ्यात दोन्ही बाजूने दरडी कोसळत असल्याने परशुराम घाटातील वाहतूक धोकादायक झाली होती.
येथील डोंगर कटाईचे काम तीन ते चार वर्षे सुरू होते. तरीही हे काम सुरू असताना अपघात होऊन दोघांचा जीव गेला होता. आता परशुराम घाटातील या धोकादायक वळणाच्या ठिकाणचा कातळ फोडून पूर्ण झाला असून त्या ठिकाणी पावसाळ्यात कोसळलेली दरड हटविण्यात येत आहे. ही संपूर्ण दरड हटवून लगतच्या डोंगर कटाईचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर आवश्यक तेथे संरक्षक भिंत उभारून येत्या मार्च अखेरपर्यंत परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीस सुरू होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरडीची माती हटविण्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या बाजूला दरडीलगतचा डोंगर कापण्यात येईल. यावर्षी परशुराम घाटात चौपदरी रस्ता वाहतुकीस खुला होईल, अशी अपेक्षा आहे.