HomeRajapurराजापुरात एकाच दिवशी उभारले १०५ बंधारे

राजापुरात एकाच दिवशी उभारले १०५ बंधारे

या बंधाऱ्यांमुळे मुबलक पाणीसाठा झाला असून सुमारे ८ लाखांची बचत झाली.

एप्रिल-मे महिन्यातील संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी पंचायत समितीतर्फे लोकसहभागातून आतापासून वनराई बंधारे बांधून पाणीसाठा करण्यावर भर दिला आहे. तालुक्यामध्ये एकाच दिवशी शंभरहून अधिक बंधारे बांधण्याची उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. त्यात गावागावांत सुमारे १०५ बंधारे बांधण्यात आले. या बंधाऱ्यांमुळे मुबलक पाणीसाठा झाला असून सुमारे ८ लाखांची बचत झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात गटविकास अधिकारी विवेक गुंड, सहाय्यक गटविकास अधिकारी सुहास पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, बचत गटाच्या महिला, ग्रामस्थ, युवक आदींच्या सहभागातून हे बंधारे बांधण्यात आले आहेत.

तालुक्याला दरवर्षी एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाईला सामारे जावे लागते. पावसाने दडी मारल्याने यंदा दरवर्षीच्या तुलनेत लवकरच पाणीटंचाईची झळ पोहचण्याची शक्यता आहे. पंचायत समितीतर्फे तालुक्यातील गावा-गावांमध्ये वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार करण्यात आला आहे. विशेष उपक्रमांतर्गत एकाच दिवशी तालुक्यामध्ये शंभरहून अधिक बंधारे बांधण्याचा निर्धार पंचायत समितीने केला होता. त्याची उद्दिष्टपूर्ती करताना गावागावांमध्ये तब्बल १०५ बंधारे बांधण्यात आले आहेत.

स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामसेवक, महिला बचत गट, प्रशासन, युवावर्ग आदींच्या श्रमदानातून हे बंधारे बांधण्यात आले असून आजपर्यंत तालुक्यामध्ये दोनशेहून अधिक बंधारे बांधून झाल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली. बंधाऱ्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाला असून भविष्यातील पाणीटंचाईच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular