सेल्फी काढण्याच्या नादात अनेक दुर्घटना घडल्या आहेत तसेच मोबाइलवर बोलताना भान न राहिल्याने अनेक अपघातही घडले आहेत. खेड मधील नुकतीच कालची घटना ज्यामध्ये धरणावर सेल्फी काढताना पुतण्या पाण्यात पडला आणि त्याला वाचवायला गेलेल्या त्याच्या काकाचा देखील धरणामध्ये बुडून मृत्यू झाला. त्यामुळे सेल्फिच्या मोहापाई अनेक विपरीत घटना घडत असून, अनेकांचा जीव जाण्याच्या घटना देखील घडतात.
आता मोबाईलवर बोलत असताना बिल्डिंगवरुन तोल जाऊन खाली पडल्याने २१ वर्षीय परप्रांतीय तरुणाचा जागीच मृत्यू होण्याची घटना लांजा पानगलेवाडी कोकण पार्क बिल्डींग येथे सोमवारी २ मे रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या दरम्याने घडली.लांजा पानगलेवाडी येथील कोकण पार्क बिल्डिंग चे कामावर परप्रांतीय कामगार काम करतात. दिवसभर हे कामगार सेंट्रींगचे काम करतात. त्यानंतर रात्री दहा वाजता एकत्र जेवण करतात.
नेहमीप्रमाणे सोमवारी २ मे रोजी दहा वाजता अजय राजाराम वर्मा वय २१, राहणार असोथर, जिल्हा फतेहपुर राज्य उत्तर प्रदेश, सध्या राहणार लांजा पानगलेवाडी हा आपला मोबाईल घेऊन बोलत बोलत कोकण पार्क बिल्डींगवर गेला होता. मोबाईलवर बोलत असताना त्याचा अचानक तोल गेला आणि तो बिल्डिंगवरून खाली पडला. बिल्डिंगवरून खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची खबर त्याचा चुलत भाऊ अशोक दयाराम वर्मा वय २४ याने लांजा पोलिसांना दिली.
मोबाईलवर बोलण्याच्या नादामध्ये बिल्डींगवरील बांधकाम कुठपर्यंत केले आहे याचे भान न राहिल्याने तो बिल्डिंगवरून खाली पडला. त्याचा चुलत भाऊ आणि इतर कामगारांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु, डोक्याला गंभीर इजा झाल्याने, तो गतप्राण झाला.