रत्नागिरीतील फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशन, रत्नागिरी कृषी विभाग व गोळप ग्रामपंचायतच्या वतीने सेंद्रीय शेतीचे महत्त्व व कीटकनाशकांचा योग्य वापर या विषयावर कार्यशाळा झाली. याप्रसंगी कृषी विकास अधिकारी श्री. शेंडे यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि त्याच्या अनुदानासंबंधी सविस्तर माहिती दिली.
२३ डिसेंबर हा जागतिक शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. पण केवळ हा एकच दिवस नव्हे तर, तो कायमस्वरूपी साजरा केला पाहिजे. कोरोना काळात सर्वच उद्योगधंदे बंद झाले. पण शेती व्यवसाय चालू राहिला, शेतकरी म्हणजे आपल्या भारताची शान आहे. रत्नागिरीचे वातावरण सर्व उद्योग पिकांसाठी पूरक आहे. सध्या रत्नागिरीत घाटमाथ्यावरून पालेभाज्या येतात. परंतु स्थानिक शेतकऱ्यांनी भाजीपाला शेतीकडे वळले पाहिजे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांनी केले आहे.
भाट्ये प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुनील घवाले म्हणाले की, सेंद्रीय भाजीपाला असेल तर आपली रोग प्रतिकारशक्ती वाढणार आहे. त्यामुळे परसदारी आणि व्यावसायिक दृष्टीनेही शेतकऱ्यांनी पालेभाज्यांसह भेंडी, वाल, गवार, घेवडा, पालक आदी भाजीपाला पिकवण्याकडे जास्तीत जास्त विचार करणे गरजेचे आहे. बटाटा किंवा कडधान्यातून प्रोटीन मिळते पण पालेभाजीतून जीवनसत्व मिळतात. त्यात स्वतः च्या आवारात स्वकष्टार्जित पिकवलेल्या भाजीपाल्याने वेगळेच समाधान मिळते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बारमाही शेती करून उत्पन्न वाढवा.
या कार्यक्रमाच्या वेळी फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनच्यावतीने गावातील १७० शेतकऱ्यांना भाजीपाल्याचे बियाणे वाटप करण्यात आले. मुळा, गवार, भेंडी, पालक, पालेभाज्यांसह भाजीपाल्याचे बियाणे दिल्यामुळे या स्तुत्य उपक्रमाबद्दल गोळप ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी आभार मानले. फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे सिनियर जनरल मॅनेजर तानाजी काकडे यांनी गेली ३० वर्षे फिनोलेक्स कंपनी गोळपसह अन्य बाजूच्या गावातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा मदत करत आहे. शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी गोळप ग्रामपंचायतीने दिली आहे. या वेळी बियाणे दिले असले तरी पुढे भाजीपाल्यासाठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सहकार्य देण्याची आमची भूमिका असल्याचे सांगितले.