शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच गुन्हेगारांच्या हालचालींवर करडी नजर ठेवता यावी, यासाठी लोकसहभागातून खेड शहरात उभारण्यात आलेला ‘मिशन नेत्रा’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प देखभाल-दुरुस्तीअभावी ठप्प झाला आहे. त्यामुळे गजबजलेल्या भागांत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील संवेदनशील शहर म्हणून खेडची ओळख आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘मिशन नेत्रा’ उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविला होता. शहरांचा विस्तार होत असल्याने दिवसेंदिवस वाहतूकही वाढत आहे. एकीकडे पोलिसांचे संख्याबळ कमी, तर दुसरीकडे वाढती गुन्हेगारी हे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये ‘मिशन नेत्रा’ अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले होते. यासाठी लोकसहभागातून निधी संकलित करण्यात आला होता.
खेड शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. या उपक्रमासाठी दुबई येथील उद्योजक बशीर हजवानी यांनी हजवानी फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत केली होती. मात्र, अल्पावधीतच ही यंत्रणा डबघाईस आली आहे. खेड शहर परिसरातील अनेक कॅमेरा सध्या बंद आहेत. बसस्थानक, निवाचा चौक, गांधी चौक, तीन बत्ती नाका आदी ठिकाणी बसवलेली लाऊड स्पीकर यंत्रणाही धूळ खात पडली आहे. यामुळे वाहतूक नियंत्रणही अडथळ्यांत सापडले आहे. या कॅमेऱ्यांच्या आजूबाजूला पावसाळ्यात वेलींचा विळखा पडलेला आहे. या यंत्रणांकडे पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ती सुस्थितीत करावी, अशी आग्रही मागणी खेडवासीयांकडून केली जात आहे.

