नव्वद दिवसांच्या पावसाळी मासेमारी बंदीला अधिक चालना देण्यासाठी महाराष्ट्राचे मत्स्य विकासमंत्री नीतेश राणे यांची येत्या काही दिवसांत भेट घेतली जाणार असल्याची माहिती फेडरेशनचे समन्वयक देवेंद्र तांडेल यांनी दिली. गुजरातमध्ये झालेल्या इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन फेडनेशच्या बैठकीला महाराष्ट्रातून अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल, पालघर जिल्हाध्यक्ष विनोद पाटील, दीपेश पाघधरे, गुजरातमधून गुजरात खारवा समाजाचे अध्यक्ष पावनभाई शियार, किशोरभाई कुवराई, कन्हैयालाल सोलंकी, मुकेशभाई पांजरी, वासूभाई तांडेल आदी मच्छीमार प्रतिनिधी उपस्थित होते. मच्छीमारांशी चर्चा केल्यानंतर पटेल यांनी या संदर्भात सचिव पातळीवर सभा लावण्याच्या सूचना आपल्या विभागास दिल्या आहेत.
पाटील म्हणाले, संपूर्ण पश्चिम किनारपट्टी अरबी सागरात वसली असून, अरबी समुद्रातील सागरी देशांपैकी सौदी अरेबियाने पाच महिने, केनिया, साऊथ आफ्रिका आणि बहरन देशांनी चार महिने तर मडगझकर आणि मोझांबिक देशांनी प्रत्येकी तीन महिने बंदी लादल्यामुळे मच्छीमारांना सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मासळीसाठा मिळतो. ही बाब समजून घेऊन देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर पावसाळी मासेमारी बंदी कालावधी वाढवून तो ९० दिवसांचा करण्याकरिता केंद्र शासनाला सादर करण्याचे आश्वासन गुजरात येथील बैठकीत मत्स्यविकास मंत्री राघव पटेल यांनी दिले.
५८ प्रजाती धोक्यात – अनियंत्रित, अनियमित तसेच अशाश्वत मासेमारीमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील मासळी साठ्यात मोठ्या संख्येत घसरण होऊ लागली आहे. केंद्रीय मत्स्यकी संशोधन केंद्राच्या २०१८च्या अहवालानुसार एकूण ५८ मासळी प्रजाती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. ज्यामध्ये घोळ, पापलेट, कोळंबी, शिवंड, चिबोरे, हलवा, माकुल, टायनी, कापशी, गोईनार, फटफटी, मुशी, कट, बांगडा, पाखट, टेली बांगडा, फलई, तारली, मांदेली, सुरमई, तुवार, टुना, टोक, पोपट, हेकरू, बोंबील, धुमा, लेप आणि शिंगाडा यांच्या प्रजाती अनियंत्रित मासेमारीमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.