मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या राहिलेल्या सुमारे १२०० मीटर बंधाऱ्याचे काम वेगाने करा. पावसापूर्वी काम पूर्ण करायचे आहे. त्यामुळे मशीन व इतर यंत्रणा वाढवा, अशी कडक सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठेकेदार कंपनीला दिली. रत्नागिरी दौऱ्यावर असताना आज दुपारी मंत्री उदय सामंत यांनी मिऱ्या बंधाऱ्याला भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी ठेकेदार पवार, पत्तन विभागाचे अभियंता सिसोदे, स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आदी उपस्थित होते. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे साडेतीन किमीचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. यापैकी बाराशे मीटरचे काम अजून अपूर्ण आहे. पत्तन विभागाने केलेल्या सव्र्व्हेमधील सात डेंजरझोनपैकी एक वगळता सर्व टप्प्यांचे काम झाले आहे; परंतु पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा टप्पा शिल्लक आहे. या टप्प्याचे काम करताना यंत्रसामग्रीची ने-आण करण्यासाठी लागणाऱ्या जागेवरून वाद निर्माण झाला.
जागामालकाने याला विरोध केल्यामुळे काम रखडले होते. हे काम व्हावे यासाठी स्थानिकांनी पत्तन विभागाला निवेदनही दिले. पावसाळ्यापूर्वी हे काम व्हावे, असे स्थानिकांचे मत आहे. त्यानंतर याबाबत पत्तन विभागाने ठेकेदाराची बैठक घेऊन त्याला काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. आदेशानंतरही काही दिवसांपूर्वीच ठेकेदाराने बंधाऱ्याचे काम सुरू केले; परंतु ते कासवाच्या गतीने सुरू होते. कमी यंत्रणा आणि मशिनद्वारे बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात केली आहे. याबाबत पतन विभागाने ठेकेदाराला सूचना देऊनही त्यामध्ये सुधारणा झाली नव्हती. आज मंत्री उदय सामंत यांनी बंधाऱ्याच्य कामाची पाहणी केली. पावसापूर्वी काम पूर्ण करायचे आहे. कामाचा वेग वाढवा आणि मशिनरी देखील वाढवा तरच ते शक्य आहे, अशी सूचना केली.