चिपळूण शहरला बसणार पुराचा विळखा, त्यातून व्यापारी वर्गाचे होणारे नुकसान, सर्वसामन्यांचे विस्कळित होणारे जनजवीन यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी दाभोळ ते पेढे जलमार्ग, चिपळूण शहर पूरनियंत्रण प्रकल्प, तसेच पर्यटन प्रकल्प राबवण्याच्या दृष्टीने दिल्ली येथे केंद्रीय बंदर नौकानयन, जल वाहतूक आणि पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेतली. प्रकल्प किती महत्त्वाचा आहे, चिपळूण शहरात ही काळाची गरज असल्याचे पटवून दिले असून, नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी राजापूरचे राष्ट्रवादीचे युवा नेते अजित यशवंतराव, सामाजिक कार्यकर्ते संजीव अणेराव आणि श्री. कपूर उपस्थित होते. दाभोळ ते पेढे (गोवळकोट) या राष्ट्रीय जलमार्ग क्र. २८ आणि पेढे येथील नियोजित रो-रो आय डब्ल्यू टी टर्मिनलला मंजुरी देऊन हे काम मार्गी लावल्याबद्दल आमदार निकम यांनी मंत्री श्रीपाद नाईक यांचे आभार मानले. या जलमार्गाच्या विकासामुळे मालवाहतुकीबरोबरच प्रवासी वाहतूक आणि पर्यटन व्यवसायाला ही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. प्रकल्पामुळे चिपळूण शहराच्या पूरनियंत्रणाला ही फायदा होणार आहे.
चिपळूण शहर पूरनियंत्रणाबाबत केंद्राकडे पाठवायच्या प्रस्ताबाबत आमदार निकम यांनी श्रीपाद नाईक यांच्याशी चर्चा केली. यासाठी संपूर्ण वाशिष्ठी नदीच्या उगमापासून संगमापर्यंत सखोल सर्व्हे आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत, त्याचीही माहिती नाईक यांना दिली. चिपळूण शहर पूरनियंत्रणासाठी आमदार निकम यांचा केंद्रीय जलशक्ती मंत्रालय आणि बंदर नौकानयन, जलवाहतूक मंत्रालयाशी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.