अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३६ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी यांनी बोलताना पेट्रोल बद्दल मोठी घोषणा केली आहे. या कार्यक्रमाच्या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कृषी विद्यापीठातर्फे ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
देशात इंधनाच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत असून, त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं आणि महत्वाच विधान केले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढच होत आहे, त्यामुळे येत्या पाच वर्षांत देशातून पेट्रोल संपुष्टात आणून त्यावर बंदी घालण्यात येईल असे म्हटले आहे.
सध्या राज्यात त्यांनी केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. गडकरी म्हणाले की, आता विदर्भात तयार होणारे बायो-इथेनॉल वाहनांमध्ये वापरले जात आहे. विहिरीच्या पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन बनवता येते आणि ते ७० रुपये प्रति किलो दराने विकता येते. त्यामुळे येत्या पाच वर्षांत देशात पेट्रोल संपण्याचीही शक्यता असल्याचे गडकरी म्हणाले. कोणताही शेतकरी केवळ आपल्यापुरती गहू, तांदूळ, मका लावून आपले भविष्य बदलू शकत नाही, तर शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता न राहता, ऊर्जा प्रदाता बनण्याची गरज आत आयेऊन ठेपली आहे. असेही गडकरींनी यावेळी स्पष्ट केले.
विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विद्यापीठ बरेच काही करू शकते असेही गडकरी म्हणाले. तसेच इथेनॉलच्या निर्णयामुळे देशाचे वीस हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. भविष्यात दुचाकी आणि चारचाकी वाहने ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल आणि सीएनजीवर आधारित असतील. विदर्भातून बांगलादेशात कापूस निर्यात करण्याची योजना असून त्यासाठी विद्यापीठांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.