ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मोठी माहिती दिली आहे. राज्यामध्ये गेल्या २२ दिवसांपासून लोडशेडिंग करण्यात आलेले नाही. त्यामुळे या पुढेही लोडशेडिंग होणार नाही, अशी माहिती दिली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोळसा टंचामुळे वीज निर्मिती होण्यास अडचण निर्माण झाल्याने, लोडशेडिंगचा सामना करावा लागत होता. परंतु, यापुढे कोळशाची कमतरता भासणार नाही आणि महानिर्मितीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
देशातील इतर १२-१३ राज्यामध्ये लोडशेडिंग सुरु करण्यात आले आहे. परंतु, महाराष्ट्रात आता लोडशेडिंग नाही ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे, असे मत नितीन राऊत यांनी व्यक्त केले. काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना अचानक मंत्रालयामध्ये लाईट गेली होती. यावर बोलताना नितीन राऊत म्हणाले, मुंबई किंवा मंत्रालय या ठिकाणी कामकाज महावितरणाचे नसते. तेथे टाटा, बेस्ट आणि अदानी या कंपन्या काम करतात. मंत्रालयाचा परिसर बेस्टच्या अंतर्गत येतो. आणि आमच्या नियंत्रणाखाली तो भाग येत नसल्यामुळे, आम्ही याबाबत चौकशी करू शकत नाही.
केंद्राने कोळशाचे नियोजन व्यवस्थित केले नाही. “शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असे प्लॅन केले आहेत. मालगाड्या सुरू केल्या तरी व्यवस्थित पुरवठा होत नाही. त्यामुळे केंद्राने कोळसा साठा आणि वीज निर्मिती करण्यावर नियोजनपूर्ण विचार करणे गरजेचे आहे.
मान्सून सुद्धा काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव कायमच सुरु असतो. परंतु ऐन उन्हाळ्यामध्ये राज्यात उष्म्याचा कहर असताना सुध्दा महावितरणाने लोडशेडिंग न केल्यामुळे नक्कीच जनतेला दिलासा मिळाला आहे.