‘संविधान बदलण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. असा अपप्रचार वारंवार काँग्रेस पक्ष करत आहे; मात्र संविधान बदलण्याची ताकद कोणाचीच नाही. ते बदलणे अशक्यच आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकार मंत्री तसेच रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. भरणे येथे आयोजित रिपाईचे कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोरे व कोकण युवक अध्यक्ष सुशांत सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित रिपाइंच्या कोकण मेळाव्यात ते बोलत होते. आठवले म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देणे कधी आठवले नाही.
संसदेच्या सेंटर हॉलमध्ये त्यांची प्रतिमा लावण्याची कधी आठवण झाली नाही. असा काँग्रेस पक्ष सत्ताधारी संविधान बदलू पाहत आहेत, अशी खोटी अफवा उठवून देशात संभ्रम निर्माण करत आहे; मात्र संविधानाचा गाभा इतका मजबूत आहे की, तो कोणालाच बदलणे शक्य नाही. तसे झाल्यास आम्ही आमचे प्राण पणाला लावू. आमच्यात कितीही गट असू द्या दिल्लीपर्यंत पोहोचणारा पट्ट्या मी एकच आहे. मी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते. त्यामुळे विकासाचे मुद्दे महत्वाचे असून यापुढे मत मिळवण्यासाठी खोटे मुद्दे यापुढे चालणार नाहीत, असे आठवले यांनी स्पष्ट केले.