साम, दाम, दंड, भेद वापरुन बारसूमध्ये होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश शासनाने प्रशासनाला दिले आहेत. प्रकल्पाबाबत असलेले गैरसमज चर्चेतून दूर करावेत यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आदेश देण्यात आले आहेत. मात्र जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांचा संवाद हा एक फार्स असल्याचा रिफायनरी विरोधकांचा आरोप असून चर्चेचे केवळ नाटक केले जात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे रिफायनरी विरोधक आक्रमक झाले असून सर्वेक्षणाला प्रखरपणे विरोध करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. बारसू – सोलगाव रिफायनरीबाबत विरोधकांशी संवाद साधून शेतकऱ्यांची भूमिका उद्योगमंत्री बदलण्याची जबाबदारी तथा पालकमंत्री उदय जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांच्यावर सोपवली. पत्रकार शशिकांत वारिशे खून प्रकरणानंतर मागे पडलेली रिफायनरी चीनमधील कराराने पुन्हा चर्चेत आली.
फडणवीसांची प्रतिष्ठापणाला :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नाणार रिफायनरी प्रस्तावित करण्याचा विचार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला मात्र, स्थानिक जनता आणि शिवसेना यांच्या विरोधामुळे नाणार रिफायनरी अधिसूचना रद्द करावी लागली.आता बारसू औद्योगिक वसाहतीत रिफायनरी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून बारसू – सोलगाव पंचक्रोशीत जागा उपलब्ध करुन देऊ, असे कळविले होते. मात्र सत्तांतर झाल्याने उद्धव ठाकरेंना याविषयात पुढे जाता आले नाही. आता ही जबाबदारी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांची बनली आहे आणि त्यादृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
सर्वेक्षणाचे शासनाचे आदेश :- गेल्या महिन्यात चीन देशांमध्ये रिफायनरीचे दोन प्रकल्पाचे करार झाल्याने राजापुरातील बारसू -सोलगाव रिफायनरीचे भवितव्य धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाल्याने महाराष्ट्रातील सरकारमध्ये चलबिचल सुरु झाली. बारसू -सोलगाव रिफायनरीला स्थानिक जनतेचा विरोध असल्याने सरकारला रिफायनरीचे काम सुरु करता आले नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारसू येथे साम, दाम, दंड, भेद वापरुन रिफायनरी सर्वे क्षण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याचे बोलले जात आहे.
संवाद एक फार्स :- अलिकडेच पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांनी बारसू-सोलगाव येथील शेतकरी यांच्याशी संवाद साधून रिफायनरीसाठी त्यांची सहमती मिळवावी असे आदेश दिले आहेत. मात्र चर्चेचा हा केवळ फार्स असल्याची प्रतिक्रिया रिफायनरी विरोधकांची आहे.
विरोधक आक्रमक :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्वेक्षणाचे आदेश आणि जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांचा संवाद रोखण्यासाठी बारसू -सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना मुंबई आणि स्थानिक पदाधिकारी यांच्या मुंबई येथे बैठक घेऊन प्रशासनाला सर्वे क्षण करु न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानिक जनतेला मुंबईकरांची रसद मिळणार असल्याने रिफायनरी विरोधक आक्रमक झाले आहेत. यामुळे रिफायनरीवरून पुन्हा एकदा संघर्ष उफाळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.