30.4 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRatnagiriशिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते धडकले नगर परिषद वर-मोर्चाचा दिला इशारा . . .

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते धडकले नगर परिषद वर-मोर्चाचा दिला इशारा . . .

रखडलेली विकास कामे, सातत्याने फुटणारी पाईपलाईन, कचऱ्याचा प्रश्न यासह नव्याने होऊ घातलेले काँक्रीटचे रस्ते याविषयावरुन महाविकास आघाडीतील ठाकरे गट व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नगर पालिकेवर धडक दिली. सध्याच्या सुरु असलेल्या एकतर्फी कामाकाजावरुन हल्लाबोल करीत नगर पालिका प्रशासक व मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला. काही ठराविक मंडळींच्या मार्फतन.प.ची यंत्रणा सुरू आहे, असा आरोप करत हे तत्काळ थांबले नाही तर महाविकास आघाडी रत्नागिरी नगर परिषदेवर मोर्चा घेऊन येईल, असा इशारादेखील यावेळी शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, माजी नगराध्यक्ष मिलींद कीर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष निलेश भोसले, ठाकरे गटाचे शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहर संघटक व तालुका युवाअधिकारी प्रसाद सावंत, संजू साळवी यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी नगर परिषदेवर अचानक धडक दिली. यावेळी प्रशासक तुषार बाबर यांची भेट घेऊन शहरात सध्या सुरु असलेल्या कामकाजाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

रत्नागिरी शहरातील काही प्रभागांमध्ये विकास कामे निधी मंजूर होऊन रखडवण्यात आली आहेत, असा दावा या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. विकास कामांना मिळालेला निधीही रद्द झाला आहे. शहरातील माजी नगरसेवक राकेश नागवेकर यांच्या प्रभागात सुमारे २५ लाखाचा रस्ता समुद्र किनाऱ्यावरुन मंजूर झाला होता. दोन वर्ष हे काम आता करतो असे सांगून अधिकाऱ्यांनी ठेवून दिले, असा आरोप यावेळी करण्यात आला. या कामाची निविदा रद्द झाल्यामुळे निधीही परत गेला. कुणाच्या सांगण्यावरुन हे काम रखडवण्यात आले असा प्रश्न यावेळी पदाधिकाऱ्यांनी विचारला मुख्याधिकाऱ्यांना. नगर पालिकेवर सध्या प्रशासक असूनही सकाळी काही सफाई कामगार हजेरी लावण्यासाठी काही माजी नगरसेवकांच्या घरी जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी मुख्याधिकाऱ्यांसमोरचं धारेवर धरण्यात आले. माजी नगरसेवकांच्या घराबाहेरील कचरा वेळेत काढला जातो परंतु काही प्रभागातील रस्त्यावरील कचराच अनेक दिवस काढला जात नसल्याचा आरोप यावेळी माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी यांनी केला.

मिरकरवाडा जेटीजवळील सार्वजनिक शौचालय व प्रसाधनगृह बंद असल्याने, स्थानिक मच्छीमार महिलांसमोर मोठा प्रश्न उभा रहात आहे. गेली सहा महिने पाठपुरावा करुनही त्याकडे नगर पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे माजी नगरसेविका रशिदा गोदड यांचे म्हणणे होते. हे प्रसाधनगृह व शौचालय तातडीने सुरु करण्यात यावे अशी मागणी त्यांनी व अन्य पदाधिकाऱ्यांनी केली. सध्या शहरातील प्रमुख रस्त्यांच्या काँक्रीटी करणासाठी कोट्यावधी रुपये आणण्यात आले आहेत. शहरासाठी ही चांगली गोष्ट आहे. परंतु वर्षभरापूर्वी करण्यात आलेले रस्ते किमान दोन वर्ष करण्यात येऊ नयेत, या निधीमध्ये पंधरा टक्के निधी नगर पालिकेने द्यायचा आहे. त्याऐवजी शीळ धरणावर कोट्यावधीचा निधी खर्च झाल्यास, धरणाची पाण्याची साठवण क्षमता वाढेल त्यामुळे शहराला नियमित पाणीपुरवठा होऊ शकतो अशी भूमिका यावेळी बंड्या साळवी यांनी व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बशीर मुर्तुझा यांनी मुख्याधिकारी बाबर यांना सांगितले की, सर्वच पक्षाच्या माजी नगरसेवकांनी सांगितलेली कामे झाली पाहिजेत. कोणी वैयक्तिक कामे घेऊन येत नाहीत, नागरिकांचेच प्रश्न सोडवण्यासाठी येत असतात. त्यामुळे सर्वांकडेच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे, कर्मचाऱ्यांनी दबाव झुगारुन काम करावे अशी मागणीही मुर्तुझा यांनी यावेळी केली. महाविकास आघाडीकडून सूचवलेल्या कामांकडे दुर्लक्ष झाल्यास नगर पालिका व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढावा लागेल, असा इशाराही मुर्तुझा यांनी दिला. यावेळी ठाकरे गटाचे युवा पदाधिकारी दुर्गेश साळवी, महिला मनिषा बामणे, निखिल बने आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular