सध्या भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रभामुळे आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय सेवेवर खूपच प्रमाणात ताण निर्माण झाला आहे. बर्याच प्रमाणात कोरोना वरील औषधे, लसी, ऑक्सिजन, हॉस्पिटल बेड्स अशा एक ना अनेक समस्यांना देश सध्याच्या घडीला तोंड देत आहे. या सर्व वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे देशातील सामान्य नागरीकापासून ते अनेक शास्तज्ञ, वैज्ञानिक कोरोना विषाणूचा नाश करण्यासाठी हर तर्हेने नवनवीन संशोधन करत आहेत.
त्यातच आज देशातील पहिला प्रयोग ऑक्सिजनची निर्मिती साखर कारखान्यातून करण्याचा आज यशस्वी झाला आहे. उस्मानाबाद मधील धाराशिव या खाजगी साखर कारखान्यामध्ये रोज नव्वद ते शंभर मोठ्या आकाराची सिलेंडर भरतील एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येत आहे. येत्या काळात या प्रमाणात वाढ करून, हे प्रमाण ६०० सिलेंडरपर्यंत वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. देशभरामध्ये ओक्सिजांची कमतरता जाणवू लागल्यानंतर एखाद्या साखर कारखान्यातून एवढ्या जास्त प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो यावर विश्वास बसणे कठीणच ! परंतु, धाराशिव साखर कारखान्याने हे महत्वाचे पाऊल उचलून त्यात यश मिळवून दाखवलं आहे.
धाराशिव कारखान्यामध्ये आधीपासून इथेनॉल आणि अल्कोहोलची निर्मिती केली जाते. त्या उत्पादनासाठी ६० कोटी रुपयांची गुंतवणूक करून सर्व अद्ययावत यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. त्यामुळे उभ्या असलेल्या पुर्वीच्याच यंत्रनेवर हा प्रयोग करायचे निश्चित करण्यात आले. कारखान्यामध्ये आणखी एक कोटी रुपयांची गुंतवणूक करून मौज इंजिनीयरिंगच्या धीरेंद्र ओक यांनी संपूर्ण भारतीय बनावटीचा ऑक्सिजन प्लॅंट बनविण्यात यश मिळविले आहे. यामध्ये ऑक्सिजन निर्मितीसाठी परदेशी बनावटीचा कॉन्सन्ट्रेटर आणि जर्मनीमधून मॉलिक्युल आयात करावे लागले आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या काळात सामान्य जनतेला ऑक्सिजनच्या तुटवड्याअभावी प्राण गमविण्याची वेळ येऊन ठेपली त्यावेळी माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी देशातील २५ खाजगी साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करण्याच्या तंत्राबाबत सुचवलेलं. परंतु आजपर्यंत केवळ चार साखर कारखान्यांनीचं ऑक्सीजन निर्मिती साठीच्या यंत्रणेची मागणी नोंदवली आहे. इथेनॉल निर्माण करणाऱ्या कारखान्यांचे तेल कंपन्या बरोबर इथेनॉल पुरवठ्याचे करार असतात, ते करार संपुष्टात येऊन नुकसानीला सामोरे जावे लागेल, याची भीती इतर साखर कारखानदारांना वाटत असल्याने स्वत:हून पुढे यायला कोणीही धजत नाही.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या ऑक्सिजन निर्मितीच्या आवाहनानंतर पंढरपूरचे तरुण उद्योजक अभिजित पाटील यांनी नुकसान सहन करत हे निर्मितीचे पहिले पाऊल उचलले आहे. २३ एप्रिल रोजी वसंतदादा इन्स्टिट्यूटने झूम मिटिंगच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख साखर कारखानदारां बरोबर मिटींग घेतली होती. राज्यात एकूण १७४ इथेनॉल निर्मिती करणारे साखर कारखाने असून, आता अभिजित पाटील यांनी टाकलेल्या यशस्वी पाऊलानंतर उर्वरित कारखान्यांनीही असा प्रकल्प करण्यास पुढाकार घेतल्यास राज्यालाच काय तर देशालाही ऑक्सिजन पुरेल एवढी क्षमता महाराष्ट्रात उत्पादित होऊ शकेल. ज्या कारखान्यांकडे इथेनॉल प्रकल्प सुरू आहेत, त्यांनी आपल्या प्रकल्पामध्ये जुजबी बदल करून अतिरिक्त सामग्रीमध्ये मॉलेक्युलर सिव्ह वापरून, हवेतील वायुव्दारे ऑक्सिजनची निर्मीती मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते हे अभिजीत पाटील यांनी समजून घेत आपल्या धाराशिव साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती करण्याचे पाउल यशस्वी केले आहे.