मुंबई-गोवा महामार्गावरील महत्वाच्या आणि ऐतिहासिक परशुराम मंदिरामुळे भाविकांसाठी श्रद्धेचे स्थान असलेला परशुराम घाट दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. या परिसरात सुरू असलेले रस्ता रुंदीकरणाचे काम किंवा अन्य भूगर्भीय कारणांमुळे या डोंगरावरील माती ढळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
येथे करण्यात आलेल्या भूगर्भीय सर्वेक्षण मध्ये प्रथमच परशुराममधील लांबेवाडी, सुतारवाडी, ब्राह्मणवाडी, दुर्गवाडी आणि पेढे गावातील कुंभारवाडी, बौद्धवाडी व अशा अनेक वाड्यांमधील काही भागाचा दरडप्रवण क्षेत्रामध्ये समावेश झालेला दिसून आला आहे. परिणामी, येथे पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
चौपदरीकरणा दरम्यान महामार्गावरील परशुराम घाट पोखरताना ठेकेदार कंपनीने आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने घाटाच्या पायथ्याशी वसलेले पेढे आणि घाटाच्या माथ्यावर असलेले परशुराम ही दोन्ही गावे भितीच्या सावटाखाली वावरत आहेत. या दोन्ही गावांत एकूण ७० कुटुंबे असून ठेकेदार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे येथील ग्रामस्थांवर जीव मुठीत धरून दिवस काढण्याची वेळ निर्माण झाली आहे.
त्याचप्रमाणे, महामार्गाच्या कामामुळे गावाबाहेर पडण्याची पायवाट देखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ७० कुटुंबांचा संपर्क तुटला आहे. गावातील नागरिकांनी या संदर्भात पर्यायी व्यवस्था केली आहे; मात्र तीही पायवाट धोकादायकच आहे.
गेल्या महिन्यात सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी या भागाचा दौरा केला होता. त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीमध्ये पेढे आणि परशुराम या परिसरात सध्या जी कामे सुरू आहेत ती पुढील ११ महिन्यात पूर्ण करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली. तसेच हि कामे सुरू असताना येथील कुटुंबांचे तात्पुरते पुनवर्सन देखील करण्यात यावे आणि काम पूर्ण झाल्यानंतर येथील ग्रामस्थांना त्यांच्या स्वताच्या घरामध्ये पुनर्स्थित करा, अशी सूचनाही मंत्री चव्हाण यांनी केली आहे. परशुराम घाटात असलेल्या धोकादायक कुटुंबांच्या पर्यायी जागेचे पुनर्वसन करण्याचे आदेशामुळे पुढील ११ महिन्यात घाटातील काम पूर्ण करण्याचे आव्हान राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनीसमोर उभे ठाकले आहे.